‘त्या’ पुरुषांची जात नराधम..; मणिपूर घटनेसंदर्भात सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मणिपूरमध्ये २ महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यासारखी अत्यंत लाजिरवाणी घटना घडल्यापासून कुणाचाच जीव थाऱ्यावर नाही हे येणाऱ्या प्रतिक्रियांमधून समजत आहे. सामान्य नागरिक, राजकीय नेते मंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि अनेक मराठी कलाकारांनीदेखील यावर संताप व्यक्त केला आहे. नुकतंच या प्रकरणावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये लिहिलंय, ‘माझी मुलगी ११ वर्षाची आहे.. तिला सध्या सुट्टी आहे.. सुट्टीत तिच्यासाठी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आम्ही प्लॅन करतअसतो.. त्यातली एक गंमत म्हणजे रोज वर्तमानपत्रातल्या ३-४ बातम्या तिने वाचायच्या..कला, क्रीडा, समाज, राजकारण, विज्ञान, विश्व, माणसं.. ह्याबाबत कितीतरी गोष्टी तिच्या कानावर पडतात, तिलासांगण्याच्या निमित्ताने आमची माहिती, स्मृती ताजी होते.. किती मजेत जाते सकाळ..पण गेल्या आठवड्यापासून माझा थरकाप उडाला आहे.. मी आणि नचिकेत कावेरीपासून पेपर लपवतो आहोत.. एका लहान निरागस मुलीला आपल्या देशातली ही बातमी कुठल्या तोंडानं सांगू आम्ही..? की एका मोठ्या जमावाने दोन स्रियांना विवस्त्र करून हुल्लडबाजी करत, त्यांच्या शरिराला निंदनीय स्पर्श करत त्यांची धिंड काढली.. हा विकृत खेळ दिवसाढवळ्या झाला.. त्या असहाय्य स्त्रिया बचावासाठी पळत असताना कुठलाही समर्थ जबाबदार पुरूष त्यांना वाचवायला पुढे आला नाही’.

‘स्त्रीवर परिस्थितीचा, इतिहासाचा सूड उगवू शकतो हे कोणी ठरवलं.. कोणी ठरवलं की स्त्री एक साधन आहे – तिचा आपण हवा तसा उपयोग करू शकतो.. तीव्र संताप येतोय तेचतेच लिहिण्याचा.. १० सेकंद एक व्हिडीओ पाहू शकले मी .. त्यात काहींनी त्या बायांना केलेले अक्षम्य क्रूर अश्लील स्पर्श दिसले.. त्यात त्या पुरूषांची जात दिसली – त्या जातीचं नाव होतं नराधम ! साधा चुकून पाय लागला कोणाला तर चटकन नमस्कार करतो आपण.. परस्त्रीला मातेसमान मानतो आपण.. भारतीय संस्कार किती महान असतात म्हणतो आपण.. मग..? हे आहेत आपले संस्कार..? अब्रूचे धिंडवडे काढायला शिकवणारे..? बलात्कार झाल्यानंतर हौतात्म्य आणि सहानुभूती देणाऱे..?’

‘आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहेत, मंगळावर यान पाठवणाऱ्या प्रामुख्यानं महिला शास्त्रज्ञ आहेत- ह्यासाठी अभिमान वाटून घेत असताना हे काय घडून बसलं.. सरकार, पोलीस, पत्रकार, समाजसेवक, न्यायव्यवस्था त्यांचं कर्तव्य करतीलंच.. आशा तरी ठेवूया.. गरज आहे ही मानसिकता बदलण्याची.. हे पुरूष बदलण्याची ! अशा गुन्ह्याला जबरदस्त दहशतीची शिक्षा सुनावण्याची – अशी सजा – जी ऐकून त्या झुंडीच नाही , तर कुणाच्याच पुढच्या सात पिढ्या मनातही पाप करू धजल्या नाही पाहिजेत..रडू येऊ नये म्हणून दात घट्ट मिटून ठेवले तरी डोळ्यातून घळघळ पाणी येतंय. जीव घाबरा होतोय.. रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीबाळीला सुरक्षित घरी पोचवावंसं वाटतंय.. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, निर्वस्त्र देह कसाबसा हातांनी झाकून – धरणीमाते पोटात घे – असा मूक आक्रोशाचा भाव असलेल्या त्या दोघी मला पळताना दिसत आहेत.. कुठलं जनावरही असं पाशवी होताना ऐकलं नाहीए आपण.. मी माझ्या मुलीला जगाबद्दल काय चांगलं सांगू.. कोणालाच, कधीच अशा बातम्या वाचायला लागू नयेत.. पुष्यमित्र उपाध्यायांची कविताच अंगी बाणावी लागणार आता प्रत्येकीला……सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो.. अब गोविंद ना आयेंगे..’. सोनालीची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेक युजरन कमेंट करत तिचे समर्थन करताना दिसत आहेत.