दिपाची गोष्ट संपणार.. ‘रंग माझा वेगळा’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार; अभिनेत्री भावुक होत म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर आता प्रेमाची आणि रंगाची परिभाषा बदलणारी ‘रंग माझा वेगळा’ हि मालिका निरोपाच्या दिशेकडे मार्गस्थ झाली आहे. गेले चार वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. अलीकडेच या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला आणि आता या मालिकेचा शेवट जवळ आला आहे. त्यामुळे मालिकेतील सर्व कलाकार मंडळी भावुक झाली आहेत.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपा हे पात्र साकारणारी अभिनेत्री रेशमा शिंदेदेखील निरोप घेताना भावुक झाली आहे. दीपा या मध्यवर्ती भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले आहे. त्यामुळे या मालिकेला आणि मुख्य म्हणजे या पात्राला निरोप देणे रेश्मासाठी अवघड असल्याचे तिने म्हटले आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदेने एका यूट्युब चॅनेलसोबत संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘सेटवरची एक अशी गोष्ट जी तुझ्या कायम लक्षात राहील, ती कोणती..?’ असा प्रश्न रेश्माला विचारला असता तिने ‘लंच टाईम’ असे उत्तर दिले आहे.

रेश्मा म्हणाली की, ‘लंच टाईम हा मला कायम लक्षात राहील आहे. जेव्हा सेटवर लंच टाईम होतो तेव्हा आम्हाला खूप मज्जा येते. असा कुठलाच दिवस नाही की, आम्ही लंच टाईमला कोणी नसतो. कोणी कोणाशी भांडू दे, चिडू दे, रुसवे फुगवे असू दे किंवा कोणाच्या तरी वैयक्तिक जीवनात काही घडलं जरी असेल तरी कधी कोणीच लंच टाईम मीस केला नाही. आमच्या तिथे खूप गप्पा होतात. म्हणून आम्ही सरांना सांगतही असतो की, वेळेत ब्रेक करा वगैरे. त्यामुळे मालिका संपल्यानंतर या गोष्टीची मला खूप आठवण येईल’. माहितीनुसार, हि मालिका संपल्यानंतर त्या जागी ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु होणार आहे. ज्यामध्ये तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.