मिलिंद गवळींची रक्षाबंधनानिमित्त खास पोस्ट; म्हणाले, ‘आजपर्यंत माझ्या बहिणीनेच माझी रक्षा केली..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज महाराष्ट्रात रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या नात्याचा गोड सण साजरा केला जात आहे. यानिमित्त जो तो सोशल मीडियावर आपल्या बहिणींसोबतचे, भावांसोबतचे फोटो तसेच व्हिडीओ, किस्से, आठवणी शेअर करत आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी मंडळींचा देखील समावेश आहे. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनीदेखील अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी बहिणीसोबत रक्षाबंधन साजरं करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

यासोबत मिलिंद यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘रक्षाबंधन/राखी पौर्णिमा.. लहानपणापासून हा सण फारच मोठा सण म्हणून आमच्या घरात मानला जायचा साजरा केला जा, माझी आई दादरच्या मार्केटमधून खूप दिवस आधीच राख्या घेऊन आलेली असायची, अगदी छान डिझाईनच्या राख्या, त्या पण एक-दोन नाही आठ दहा घेऊन यायची. माझी धाकटी बहीण संगीता छान तयारी करून मग मला ओवाळायची, नवीन शर्ट-टी-शर्ट मिळायचे, मग मस्तपैकी बर्फी पेढा किंवा लाडू भरवायची, आणि त्या काळामध्ये माझं आणि साखरेचे काही वैर नव्हतं त्यामुळे मी मनसोक्त त्याचा आस्वाद घ्यायचो, कालांतराने माझ्यात आणि साखरेमध्ये वैर निर्माण झालं. पण माझं आणि माझ्या बहिणीचं नातं अगदी घट्ट घट्ट होत गेलं, आई गेल्यानंतर, संग्याने आईची जागा घ्यायचा प्रयत्न केला, आजही ती आईचीच जागा घेते आहे’.

‘रक्षाबंधन म्हणजे भावांनी बहिणीची रक्षा करायचं वचन तो बहिणीला देत असतो, पण आजपर्यंत माझ्याच बहिणीने माझी रक्षा केली आहे. माझ्या आईची अगदी जीवश्य कंठश्य मैत्रीण जिला मी शानबाग मावशी असं म्हणायचो, दरवर्षी शानबाग मावशी माझ्या पप्पांना राखी बांधायच्या, आणि त्यांच्या दोन मुली सुमेधा आणि सुचित्रा प्रेमाने आम्ही त्यांना राणी पिंकी म्हणतो, त्या दोघी मला राखी बांधायच्या, आज शानबाग मावशी नाहीत आणि माझी आई नाही तरीही राखी पौर्णिमेची परंपरा चालू आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात , प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी कामात, व्यवसायात गुंतलेला आहे, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये प्रत्येकाला राहावं लागत आहे, अशा सणांच्या दिवशी कितीही इच्छा असली तरी एकत्र येणं होत नाही. पण अशा दिवशी बहिणीला भावाची आणि भावाला बहिणींची खूप खूप आठवण येतच असते’.

‘माझ्या या सिनेमा क्षेत्रामध्ये सुद्धा माझ्या असंख्य बहिणी आहेत, त्यात अलकाताई म्हणजे हक्काची माझी मोठी बहीण, सुप्रिया, सीमा , पूनम त्या तर मला मिलिंद दादाच म्हणतात, मला मामे बहिणी आहेत. मीनल मंजुषा माधुरी, शिल्पा आणि स्मिता, आणि शक्ती मग माझ्या मावस बहिणी आहेत. प्रीतम, सृष्टी, विद्या, ज्योती, सोनल, शितल, गुड्डी, माझ्या चुलत बहिणी आहेत वर्षा, वैशाली, स्वाती आणि वृषाली मला फक्त आते बहीण नाहीये कारण माझ्या आत्याला तीन मुलंच आहेत. आज रक्षाबंधनाच्या दिवशी मी माझ्या बहिणींना मिस करतोय, त्यांना मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो, सुख समृद्धी यश आरोग्य त्यांना, आणि त्यांच्या कुटुंबीयांना भरभरून मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना’.