.. महाराष्ट्रावर अपार प्रेम करणाऱ्या माणसानं आता ”राज” करावं! तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आलंय. या राजकीय भूकंपाचे कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षासोबत पुकारलेले बंड ठरले आहे. नुकतीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या घटनेने राज्याच्या राजकारणातील सर्व सूत्रे अचानक फिरली. दरम्यान केवळ अजित पवार नव्हे तर त्यांच्यासोबत इतरही काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काही काळापूर्वी एकनाथ शिंदेंनी असेच शिवसेनेशी बंड केले होते आणि एका पक्षाचे दोन पक्ष झाले. यानंतर आता अजित पवारांचं हे मोठं बंड चर्चेचा मोठा विषय ठरले आहे. यावर अनेक राजकीय मंडळींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय मनोरंजन विश्वातील काही मंडळींनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील हा उद्रेक मराठी पाहता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यात तिने सुरुवातीला महाराष्ट्रातील राजकारणाला भेळ म्हणून संबोधले आहे. तिले लिहिलंय, ‘भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!.’ यानंतर तेजस्विनीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये तेजस्विनीने लिहिलंय कि, ‘तत्वनिष्ट, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अश्याच माणसानं आता महाराष्ट्रावर “राज” करावं!!! – महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक’. या पोस्टमधून राज्याचे मुख्यमंत्रीपद राज ठाकरे यांना देण्याचा स्पष्ट इशारा तिने केला आहे.

दरम्यान अजित पवार हे आपल्या ३५ आमदारांसह शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा आणि तितकाच गंभीर बदल झाला आहे. या सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून इतर ८ आमदारांनी विविध मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षाचं सरकार तूर्तास तरी अस्तित्वात आलं आहे. या सरकारमध्ये अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सध्या सर्वत्र या राजकीय घडामोडीवर चर्चा केली जात आहे.