‘शत्रू कारस्थानी आहे.. आंदोलनात छुपी घुसखोरी..’; किरण मानेंची मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगेंसाठी पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेट घेताना दिसतोय. जालन्यात आंदोलक त्यांचे उपोषण थांबवण्यास काही तयार नाहीत. दरम्यान अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात दगडफेक झाल्याचा दावा करून पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर आंदोलनाला गालबोट लागलं आणि यामध्ये पोलिस तसेच ग्रामस्थ जखमी झाले. ही घटना अत्यंत संतापजनक होती आणि याचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. अशातच अभिनेता किरण माने यांनी मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगेंसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

जालन्यातील या लाठीचार्ज प्रकरणावर संताप व्यक्त करत किरण मानेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या मराठा बांधवांनो… थेट बोलतो… आपल्याला धर्माच्या नावावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की ‘एका जातीवर’ झाला असं समजलं जातं. आधी शेतकर्‍यांवर, मग वारकर्‍यांवर आनि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुनाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागनार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पायजे’.

‘मनोज जरांगे पाटील…तुमच्याबद्दल काय बोलू? या भाकड काळात तुमी जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय… रक्त सळसळायला लागलंय… हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकार्‍यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन!’

‘अशा पोस्टवरनं जे कायम मला ट्रोल करतात त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुनाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्‍या शेतकर्‍याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकर्‍यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असेपर्यन्त बोलत र्‍हानार. आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे… न्याय मिळालाच पायजे. जय शिवराय. जय भीम.किरण माने. एकमराठालाख_मराठा’.