‘कुठेतरी थांबायला हवं…’ म्हणत केदार शिंदेंनी घेतला मोठा निर्णय


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक दमदार आणि दर्जेदार कलाकृती देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. या वर्षभरात केदार शिंदे यांनी २ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. यातील ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट केदार शिंदेंचे आजोबा आणि लोकशाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित होता. तर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने सहा बहिणींची गोष्ट अत्यंत मार्मिकपणे मांडली आहे.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने- कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब-चौधरी या सहा गुणी अभिनेत्रींनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे अभूतपूर्व यश हे चर्चेचा विषय ठरले. या भव्य यशानंतर आता केदार शिंदे यांनी अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये केदार शिंदे यांनी लिहिलंय, ‘एक लांबलचक सुट्टी घेतोय या इंस्टाग्रामवरून… तुमचं प्रेम आजपर्यंत मिळालं. पण, खरं सांगू…? कुठेतरी थांबायला हवं, नव्या विचारांसाठी… बाय फॉर नाऊ!’. याचा अर्थ असा कि, केदार शिंदे आता काही काळ इंस्टाग्राम हॅण्डल वर सक्रिय नसतील. यावरून असा अंदाज लावला जातोय कि, आगामी प्रोजेक्ट्स आणि नव्या चित्रपटांचं काम करण्यासाठी केदार शिंदेंनी हा ब्रेक घेतला आहे.