पडदा पडला आहे!! गौतमी देशपांडेच्या आजोबांचे वृद्धापकाळाने निधन; अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रकाशझोतात आलेल्या देशपांडे बहिणी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे दोघीही उत्तम अभिनेत्री असून त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, देशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौतमी- मृण्मयीचे आजोबा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मृण्मयी आणि गौतमी दोघीही आजोबांच्या फार जवळ होत्या. त्यामुळे आजोबांच्या निधनानंतर गौतमीने जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

हि पोस्ट शेअर करताना गौतमीने लिहिलंय, ‘प्रिय आजोबा… पत्रास कारण की, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला! आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाच्या बाबांची, आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळ्या भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं… पण आजोबा काय सांगू तुम्हाला.. इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका! प्रत्येक भूमिकेच वेगळेपण जपलं तुम्ही… कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं…. सुरूवात झाली ती स्वतःचे वडील जाण्यापासून…. नंतर आईचा पुनर्विवाह…. नवीन कुटुंबामध्ये प्रवेश…. नवीन भावांचं सक्ख्यानपेक्षा जास्त प्रेम…. तुमच्यासारख्या handsome नायकाला साजेल अशा सुंदर नायिकेचा आयुष्यात प्रवेश… नायकाचं नाटकाविषयाचं प्रेम… लग्न.. दोन गोड मुलांचा जन्म… सारंच कथानक एखाद्या फिल्मला लाजवेल असं…. तुमचे एक एक प्रवेश पण काय लाजवाब आजोबा …’

‘“एखाद्याचं नशीब” म्हणत एक सुंदर नायिका आयुष्यात आली.. नकळत पणे मनाचे धागे जुळत गेले. मग “याला जीवन ऐसे नाव” म्हणत तुम्ही पुढे गेलात.. “अशी पाखरे येती” म्हणत संसार सुरु झाला..” नाटककाराच्या शोधात तुम्ही सहा पात्र फिरत गेलात… पुढे “शेहेनशाह” बनून तुम्ही “नटसम्राट” असल्याचा दाखवून दिलंत…. दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं “तो मी नव्हेच ” म्हणत राहीलात…. असे आयुष्याचे खरे खुरे “किमयागार” ठरलात… “चाणक्य ” बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात.. तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही.. प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो.. यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन काय नको असा वाटतंय.. त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणारोत आयुष्यभर.. तुम्ही आता मात्र शांत व्हा.. दमला असाल तुम्ही.. आता खऱ्या अर्थानी पडदा पडला आहे.. नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे.. तुमच्यातला हा ”नट” आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू.. अन तुमच्या 10% तरी चांगुलपणा आणि सकारात्मकता आमच्यात यावी अशी प्रार्थना करू.. तुमच्याच एका प्रवेशातल हे वाक्य.. झालेत बहू, असतील बहू, होतील बहू, पण या सम हा!! रंगदेवतेला वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते….अन त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते …. तुमची नात आणि तुमची फॅन- गौतमी’.