सत्तेत कोणी का बसेना..!! टोल धाडीवर जाब विचारणाऱ्या तेजस्विनीच्या सोशल हॅण्डलवर कारवाई; संतापून म्हणाली..,


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम व्यक्त होत असते. अलीकडेच सोमवारी तिने टोलबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर तिच्या एक्स अकाउंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आली. या कारवाईबाबत तेजस्विनी पंडितने संताप व्यक्त केला आहे.

या ट्विटर पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘कोंबडे झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही ! माझ्या X (ट्विटर अकाऊंटच व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची’ इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? X (ट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद’.

‘पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र ‘X’ फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत ! जेंव्हा जेंव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे ! ! ! जय हिंद जय महाराष्ट्र !’

दरम्यान तेजस्विनीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस बोलत आहेत कि, ‘शिवसेना- भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा तेव्हा केली होती त्यानुसार आता राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही चारचाकी आणि छोट्या गाड्यांना मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रातील टोलवर आपण फक्त कमर्शियल- मोठ्या गाड्यांचे टोल घेतो’.

या व्हिडिओसोबत तेजस्विनीने कॅप्शनमध्ये लिहिले होते कि, ‘म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!! तुमचं हे विधान कसं असू शकतं? तुम्हालाही फसवणूक झाली असे वाटत असेल तर शेअर करा!’