‘डोळ्यात राग, द्वेष, तिरस्कार घेतला…’; मराठी अभिनेत्याने दिले चाहत्याच्या प्रश्नाचे लक्षवेधी उत्तर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा अभिनेता अभिजित श्वेतचंद्र सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. ‘बाजी’, ‘नवे लक्ष्य’, ‘शुभविवाह’ यांसारख्या वेगवेगळ्या मालिकेतून विविध धाटणीच्या भूमिका साकारत अभिजीतने प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरात शिरकाव केला. आज मालिका विश्वात अभिजित श्वेतचंद्र हा चेहरा नुसता ओळखीचा नव्हे तर आघाडीचा आहे. अनेक मालिकांमधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिजीत सध्या ‘शुभविवाह’ या मालिकेत खलनायक साकारतोय. या पात्रासाठी कशी तयारी केली..? याबद्दल त्याने स्वतःच सांगितले आहे.

अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो या माध्यमाचा आवर्जून वापर करतो. नुकतंच त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ‘आस्क मी समथिंग’ हे ट्रेंडिंग सेशन घेतले होते. यावेळी त्याला त्याच्या अनेक चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. यावेळी अभिजीतने प्रत्येक चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देत त्यांचे समाधान केले. यावेळी एका चाहत्याने त्याला ‘शुभविवाह’ मालिकेतील अभिजीत पटवर्धन या खलनायकी पात्राच्या तयारीबद्दल प्रश्न विचारला.

‘नवे लक्ष्य’ या मालिकेत तू पोलिसांच्या भूमिकेत होता. त्यानंतर ‘शुभविवाह’ या मालिकेत तू खलनायकाचे पात्र साकारलेस, हा बदल कसा घडवून आणलास..? असा सवाल अभिजीतच्या एका चाहत्याने केला. यावर उत्तर देताना अभिजीतने सांगितले कि, ‘मिशी काढली, अंगावर ब्लेझर चढवला, डोळ्यात राग, द्वेष, तिरस्कार घेतला, दात, ओठ चावले, डायलॉग डिलीव्हरी बदलली… अभिजीत पटवर्धन तयार’.

सध्या खलनायक साकारत असलेल्या अभिजीतने याआधी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत पोलिस इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाड ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे अभिजित खरा प्रकाशझोतात आला.