‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचे शूटिंग पूर्ण; कलाकारांनी साजरा केला शूटिंगचा शेवटचा दिवस


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिका टीआरपी कमी असल्यामुळे तर काही मालिका कथानक संपल्यामुळे ऑफ एअर गेल्या. यामध्ये आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’चा देखील समावेश होतो आहे. लवकरच हि मालिका संपणार असून त्याजागी नवी मालिका सुरु होणार आहे. नुकताच ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडला. या शेवटच्या दिवसाला कलाकारांनी मात्र अनोख्या पद्धतीने साजरा केला.

‘ठिपक्यांची रांगोळी’ हि मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली कौटुंबिक मालिका होती. ऑक्टोबर २०२१ पासून या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अभिनेते शरद पोंक्षे, उदय टिकेकर, चेतन वडनेरे, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, सुप्रिया पाठारे, लीना भागवत, सारिका निलाटकर- नवाथे, नम्रता प्रधान अशी भक्कम स्टारकास्ट या मालिकेत आपण पाहिली. त्यांनी साकारलेले शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या केवळ घरात नव्हे तर मनामनांत पोहोचली आहेत. त्यामुळे आता मालिकेला निरोप देणं प्रेक्षकही भावनिक होणे फार साहजिक आहे.

हि मालिका टीआरपीच्या शर्यतीत कधीच मागे पडली नाही. पण आता कथानक संपल्यामुळे हि मालिका निरोपास सज्ज झाली आहे. काल मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस मालिकेतील कलाकारांनी खास पद्धतीने साजरा केला. मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आठवणीत राहण्यासाठी त्यांनी सेटवर रांगोळी काढली आणि त्यात रंगसुद्धा भरले. एकमेकांना खास भेटवस्तू दिल्या, केक कापून सेलिब्रेशन केलं, जेवणाचा बेत केला, सेल्फी काढले. यावेळी केक कापताना कलाकारांनी मालिकेचं शीर्षकगीतसुद्धा गायलं. हे लोकप्रिय शीर्षकगीतांपैकी एक ठरलं.