‘रंग माझा वेगळा’मधील सौंदर्या आता ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. या मालिकेत सौंदर्या हे पात्र साकारत अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका संपल्यानंतर हर्षदा खानविलकर यांचे चाहते त्यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. असे असताना नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच स्टार प्रवाहच्या दुसऱ्या मालिकेत हर्षदा खानविलकर याची एंट्री होणार असल्याचे समोर आले आहे.

सध्या स्टार प्रवाहची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक नवीन ट्विस्ट पहायला मिळणार आहे. कां हि मालिका तब्बल २५ वर्षांचा लीप घेतेय. मालिकेतील खलनायिका शालिनी हि गौरी- जयदीपच्या प्रेमाचा शेवट करून त्यांचं आयुष्य संपवणार आहे. यानंतर या मालिकेत गौरी आणि जयदीपच्या पुनर्जन्माच्या त्यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू होईल. या नव्या अध्यायात गौरी आणि जयदीप हे नित्या आणि अधिराज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची ही उत्कंठावर्धक गोष्ट पहायला प्रेक्षक आतुर झाले आहेत. याच गोष्टीत ‘रंग माझा वेगळा’ फेम सौंदर्या म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेत त्या सरपंचाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या पात्राचे नाव ‘वसुंधरादेवी अहिरराव’ असे आहे. हर्षदा यांनी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका फारच वेगळी आणि हटके असणार आहे. त्यामुळे या भूमीकेसाठी त्या स्वतः देखील उत्सुक आहेत. दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचा हा पुढील अध्याय येत्या २० नोव्हेंबर २०२३ पासून सुरु होतो आहे.