‘ठिपक्यांची रांगोळी’चा आज प्रसारित होणार शेवटचा भाग; निरोप घेताना कलाकार झाले भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारलेली असून या मालिकेचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सुफळ संपूर्ण कथानकासह हि मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अखेर ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता रंगबेरंगी भावनांच्या रंगानी पूर्ण होणार आहे. दरम्यान मालिकेतील पात्र जगलेले कलाकार मात्र आज निरोप घेताना भावुक झाले आहेत.

दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सुरु झाली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आज हि मालिका निरोपाकडे मार्गस्थ झाली आहे. या मालिकेत शरद पोंक्षे, उदय टिकेकर, चेतन वडनेरे, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, सुप्रिया पाठारे, लीना भागवत, सारिका निलाटकर- नवाथे, नम्रता प्रधान अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली. मालिकेतील माई, दादा, शशांक, अप्पू, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या ही पात्रे या कलाकारांनी अशी साकारली कि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत.

या मालिकेतील ट्विस्ट कायम रंजक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे होते. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी कायम उच्च राहिला आहे. त्यामुळे मालिकेला आणि प्रेक्षकांचा निरोप घेताना कलाकार मंडळी देखील अत्यंत भावुक झाली आहेत. आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल आणि या निमित्ताने मालिकेतील कलाकारांनी आपले अनुभव सांगितले आहे. ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम पेजवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हायरल होत आहे.