‘नटाच्या संपूर्ण कार्यकाळात काही मोजक्याच भूमिका..’; ‘शशांक’ला निरोप देताना चेतन झाला भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आता अप्पू- शशांकची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार नाही. मालिकेला आणि प्रेक्षकांना निरोप देताना कलाकार मंडळी प्रचंड भावुक झाली आहेत.

शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या ही पात्र साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग झाले होते. त्यामुळे मालिकेच्या ऑफ एअर जाण्याने प्रेक्षकसुद्धा नाराज झाले आहेत. दरम्यान मालिकेतील शशांक म्हणजेच अप्पूचा खडूस साकारणाऱ्या अभिनेता चेतन वडनेरेने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

चेतन वडनेरेने सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहीलं आहे कि, ‘धन्यवाद शशांक… नटाच्या संपूर्ण कार्यकाळात काही मोजक्याच भूमिका त्याच्या वाट्याला येतात ज्या कायम लक्षात राहतात. “शशांक” हे पात्र माझ्या कायम स्मरणात राहीलच पण माझ्याबरोबर अनेक कुटुंबात त्याने काही हक्काची माणसं जोडली होती त्या सर्व रसिक प्रेक्षकांनाही धन्यवाद!!
परि कोसळू द्यायचे ना स्वप्नांचे हे मनोरे।
विश्वासाने जपायचे घर आपले चंद्रमौळी॥
प्रीतीच्या रंगात सजवू ठिपक्यांची रांगोळी…’

यासोबत चेतनने पोस्टच्या शेवटी सर्व सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. चेतनच्या या पोस्टवर मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेक नेटकऱ्यांनी चेतनला नव्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता दर्शवली आहे.

तर अनेकांनी चेतनने साकारलेल्या शशांकची आठवण येईल… असेही म्हटले आहे. मालिकेतील अन्य कलाकारांनी देखील सोशल मीडिया हँडलवर भावनिक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.