‘जाणाऱ्याला थांब म्हणू नये…’; निरोप घेण्याआधी ‘संगीत देवबाभळी’च्या दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली ५ वर्ष ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. २२ डिसेंबर २०१७ रोजी हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं आणि आता २०२३ मध्ये हे नाटक निरोप घेत आहे. आज कार्तिक एकादशीच्या मुहूर्तावर या नाटकाचा शेवटचा प्रयोग मुंबईत षण्मुखानंद हॉल, सायन येथे रंगणार आहे. ‘देवबाभळी’ या लोकप्रिय नाटकाने निरोप घेऊ नये असे प्रेक्षकांना वाटत आहे. प्रेक्षकांचं प्रेम पाहून आज निरोप घेताना साहजिकच या नाटकाचे कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी भावुक झाली आहेत. दरम्यान या नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये प्राजक्त यांनी लिहिलंय कि, ‘निरोपाचं पत्र…. बये , निघालीस? ये ! जाणा-याला थांब म्हणू नये. जाणा-याला कुठं निघालीस विचारू नये. अवचित आलीस. पण जातांना मात्र सतत जाणार, निघणार, निघते, गेलेच असं सांगत राहिलीस आणि आता हा निरोपाचा क्षण. तू माया लावलीस. आपण बीज लावतो. झाड वाढवतो. झाडाला हवं नको ते पुरवतो. पण एका क्षणी कळतं की आपण नसतोच झाड वाढवत. ते वाढतं. उलट त्यानं कल्पवृक्ष होऊन पोटाशी धरावं. तुमच्याच इच्छा पूर्ण करतं’.

“बये, नाटक का थांबवताय, हा प्रश्न चहुबाजूने आला. काय सांगू त्यांना? नाटकवाल्यांचं ठरलेलं खोटं पण सत्याची शपथ घातलेलं उत्तर देऊ? ‘लवकरच’. पण आता तेही नकोच. निग्रहाने जाणा-याला पाय अडकेल असंही बोलू नये. मी बाहेर सांगतोय की दोन भेटीत अंतर असलं की आवेगानं भेटता येतं. म्हणून जातेय तू. नव्या रूपात, नव्या नाटकातून भेटी होतीलंच. पण नाटक खरंच थांबत असतं का..?’

‘खरं तर नाहीच. एखादा दीनानाथचा किंवा कालिदासचा, बहुतेक बालगंधर्वचा किंवा यशवंतचा, बहुदा घोरपडेचा. एखादा गडकरीचा.. सांगणा-यांच्या सांगण्यात नाटकाचा प्रयोग चालु राहतो. न पाहिलेल्यांच्या कुतूहलात तो प्रयोग चालु राहतो.” तू कुणाच्या लेखणीतून आलीस म्हणून त्याची नव्हती, नी कुणी तुला सादर केलं म्हणून तू त्यांची नव्हती. तूच धारण केलं होतंस आम्हाला आणि आता निघाली आहेस. हेच खरं. बरं महाराष्ट्राचा निरोप म्हणजे बाहेर भेटणार का? माहिती नाही’.

‘मग कुठे, कधी भेटणार? माहिती नाही. कशाचंच उत्तर माहिती नाहीए तर निरोपच ना हा? मी समजून घेतो. गेल्यावेळी फसवलंस. सांगून निरोप घेतल्यावर त्रास कमी होतो असं तुकाराम बीजेला खोटं सांगितलंस. अचानक निरोप घेतला की एकच निरोप ठरतो. पण तारीख सांगून घेतला की रोजची पानगळ. पण एक एक पान खुडत जावं तर झाड बोडखं होतं. इथं बहर आलाय. दुपटीनं. खोटं तरी कसं म्हणावं. जाऊ देतो, पण मी जेव्हा जेव्हा नवं काही रंगमंचावर करेन ते ह्याच तादात्म्याने करेन. तेव्हा तू येऊन धारण करशील हा शब्द दे’.

बरं ऐक..तुझ्याकडून उत्तर येणार नाहीच हे माहीती आहे म्हणून गाथा उघडून ठेवलीय मी माझ्या खिडकीपाशी. खिडकीही उघडी ठेवलीय. आता बावीस तारखेला वारं येईल. पानं फडफडतील. तेव्हा कोणत्या पानावर हे वारं थांबलेलं असेल तेही मला आताच ठाऊक आहे.
तुमची आमची हेचि भेटी । येथुनिया जन्मतुटी ॥
आता असो द्यावी दया । तुमच्या लागतसे पाया ॥
आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा ॥
बये, निघालीस? ये ! आठवणीत तेवढी ओळख देत रहा मात्र. तुझा प्राजक्त’. हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.