जेवणाच्या मेनूवरून गोखले- कोळी कुटुंबात पुन्हा पेटला वाद; कसा असेल सागर- मुक्ताच्या लग्नाचा थाट..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. प्रेक्षकांनी या मालिकेला, पालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम दिले आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे हे मुख्य भूमिकेत आहेत. हिंदी मालिकेचा रिमेक असूनही या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्या या मालिकेची कथा अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. लवकरच मालिकेत सागर आणि मुक्ताच्या लग्नाचे सनई- चौघडे वाजणार आहेत. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत गोखले आणि कोळी कुटुंबात पुन्हा भांडण झाल्याचे समोर आले आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेच्या अलीकडील भागात सागर लग्नासाठी तयार झाल्याचे दाखवण्यात आले. तर मुक्तानेही लग्नाला होकार दिलाय पण त्यासाठी तिने एक अट ठेवली आहे. ‘मिहीरने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर मी हे लग्न करेन..’, अशी अट मुक्ताने सागरला घातली आहे. यावर सागर म्हणतो कि, ‘मी तुम्हाला शेवटचं सांगेन, एक नातं जोडण्यासाठी दुसरं नातं मी तोडत नाही. मी कधीच त्याला जेलमध्ये जाऊ देणार नाही’. मुक्ता आणि सागरचं हे बोलणं मिहीर ऐकतो. दरम्यान सईच्या आनंदासाठी मिहीर पोलिसांच्या स्वाधीन व्हायला तयार होतो. यानुसार पुढील भागात मिहीर स्वतःहून पोलिसांना शरण जाणार आहे. परिणामी मुक्तादेखील लग्नाला होकार देताना दिसेल.

यामुळे आता दोन्ही कुटुंबात एक नवं नातं तयार होणार आहे. गोखले आणि कोळी कुटुंबात मुक्ता- सागरच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान जेवणाचा मेन्यू या विषयावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वादाची ठिणगी पडते. लग्नाची बोलणी सुरु असताना मुक्ताची आई म्हणते, ‘आपण छानशी कढी ठेवू या’. यावर सागरची आई म्हणते, ‘याबरोबर मटण आणि फिश फ्रायचा पण स्टॉल लावूया’. तर मुक्ताची आई म्हणते, ‘नाही, नाही हे शक्य नाही’.

यावर सागरची आई म्हणते, ‘म्हणजे? आमच्याकडच्या पाहुण्यांना काय कढी भात खायला घालू’. यावर मुक्ताची आई म्हणते, ‘हे गोखलेंच्या घरचं कार्य आहे’. तर सागरची आई म्हणते, ‘हे इंद्रा कोळीच्या पोराचं लग्न आहे’. पुन्हा मुक्ताची आई म्हणते, ‘ते लग्न होईल तेव्हा ना’. मग काय यावरून पुन्हा एकदा गोखले- कोळी कुटुंब भांडू लागत. आता असं असताना हे लग्न कसं पार पडेल..? हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.