‘ठरलं तर मग’ मालिकेची यशस्वी वर्षपूर्ती; वाहिनीने मानले प्रेक्षकांचे आभार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. ‘आता रडायचं नाही लढायचं… ठरलं तर मग’ अशा ब्रीदवाक्यासोबत या मालिकेचा पहिला प्रोमो आला. तेव्हापासून ते आजपर्यंत या मालिकेचं क्रेझ कायम राहील आहे. बघता बघता या मालिकेला १ वर्ष पूर्ण झालं आणि यानिमित्त स्टार प्रवाह वाहिनीने एक खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. संपूर्ण वर्षभरात या मालिकेने टीआरपीच्या रेसमध्ये टॉप ५ मधील जागा कधीच सोडली नाही. हि मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ठरली आहे.

या मालिकेतून अभिनेत्री जुई गडकरी (सायली) आणि अभिनेता अमित भानुशाली (अर्जुन) हि जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. गेल्यावर्षी ५ डिसेंबरला सुरू झालेल्या या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. आज हि मालिका वर्षपूर्ती साजरी करत आहे. आतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट आले आणि प्रत्येकवेळी प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली आहे. मधुभाऊंची केस, सायली- अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, प्रतिमाची एंट्री असा प्रत्येक प्रसंग या मालिकेला प्रेक्षकांच्या आणखीच जवळ नेताना दिसला. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळेच हि मालिका तरली आणि म्हणून वाहिनीने प्रेक्षकांचे आभार मानणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर मालिकेतील काही खास क्षण एकत्र केलेला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आज ‘ठरलं तर मग’ मालिकेला पूर्ण होत आहे १ वर्षे… त्यानिमित्ताने पहा अर्जुन-सायलीचा आतापर्यंतचा प्रवास… या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!’