‘कमाल गायलय.. तीचा आवाज घरंदाज वाटतो..’; ‘बाईपण भारी देवा’च्या गायिकांसाठी केदार शिंदेंची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून अजूनही थिएटरमध्ये महिलांचा चांगला प्रतिसाद आहे. या चित्रपटाचे कथानक, त्यातील गाणी, एक एक डायलॉग सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडत मराठी चित्रपटांना थिएटर का मिळायला हवे याचे परफेक्ट उत्तर दिले आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाणं प्रेक्षकांया भावलं आहे. मात्र ‘उघड्या पुन्हा जाहाल्या’ या गाण्याने तर प्रेक्षकांच्या मनात एक हळवा कोपरा मिळवला आहे. नुकतेच केदार शिंदे यांनी या गाण्याच्या गायिकांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी हि पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. केदार यांनी गायिका सुवर्णा राठोड कुलकर्णी आणि सावनी रवींद्र यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लिहले आहे कि, ‘बाईपण भारी देवामध्ये खरतर चार गाणी. त्यातलं टायटल व पिंगा हे कोरसची गाणी. त्याला स्वर देणाऱ्या ज्या ज्या आहेत त्यांना नमस्कार! एक सॅड सॅांग आहे.. स्व. श्रीकांत ठाकरे यांचं गाजलेलं गाणं. “उघड्या पुन्हा जाहाल्या”. नव गाणं करायचं नव्हतं. कारण ज्या ठिकाणी ते गाणं येतं, नवं गाणं कदाचित तेवढ अपील झालं नसतं. असं मला वाटत. एक nostalgic feel देऊन जात ते गाणं. ते गायलं आहे सुवर्णा राठोड कुलकर्णी यांनी. कमाल गायलय’.

पुढे लिहिलंय, ‘आज लोकं विचारतात की, ते गाणं रीलीज कधी करणार..? लवकरच.. आणि… शेवटचं गाणं. “मंगळागौर” ज्यासाठी केला होता अट्टाहास!! ती सगळी पारंपरिक गाणी एकत्र collage करून सादर करायची होती. हे खेळ रात्रभर चालतात. पण सिनेमात ते गाणं ३- ४ मिनिटाचं हवं होतं. त्याला स्वर देणारी सावनी रविंद्र कम्माल गायली आहे. त्याची सुरूवातीची आरती ज्या सुकूनने ती गायली आहे, तिथेच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. तीचा आवाज घरंदाज वाटतो. सहा जणींसाठी एकच असला तरी थिएटरमध्ये असा काही घुमतो की, त्यावर काही बायका प्रत्यक्ष तर काही मनातल्या मनात फेर धरून नाचतात. या सिनेमासाठी या सगळ्यांचं योगदान खुप मोठं आहे’. केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने १० दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे.