‘काल परवापर्यंत ताईचं शेपूट..’; धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर मृण्मयी देशपांडेची भावस्पर्शी पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री गौतमी देशपांडे तिचा प्रियकर स्वानंद तेंडुलकरसोबत अलीकडेच लग्न बंधनात अडकली. त्यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये हे लग्न पार पडलं. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत जागा निर्माण करणारी गौतमी आता संसाराला लागली आहे.

गौतमी देशपांडे हि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची लहान बहीण असून दोघीही कलाविश्वात कार्यरत आहेत. देशपांडे बहिणींची ही जोडी त्यांच्यातील बॉण्डिंगमुळे कायम चर्चेत राहिली आहे. अशातच आता धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर मृण्मयीने मोठी बहीण म्हणून गौतमीला एक खास सल्ला देत पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने हि पोस्ट शेअर करताना गौतमीच्या लग्नातील दोन खास फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं… प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली… या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये… आनंद.. काळजी.. आता ती officially दुसऱ्याची झाली याचं दुःख.. आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद.. सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत… काल परवापर्यंत ताईचं शेपूट असणाऱ्या आमच्या बाळाला ”संसार” करताना बघणं मजेचं असणार आहे.. यापुढे आम्हा बहिणींची gossips एकतर्फी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर, ”ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो..” ही तिची तक्रार संपेल… कारण..? तिचं तिलाच कळेल!’

‘स्वानंद.. तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाहीये… लग्नाआधीच तू फॅमिली मेंबर झाला होतासच… गौतमी स्वानंदची काळजी घे… स्वानंद गौतमीची साथ सोडू नकोस… संसार कोणाचाच सोपा नसतो.. पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणीवरती मात करता येते.. कदाचित सहज नाही… पण मात करता येते!! एकमेकांवर विश्वास असू द्या… संवाद असू द्या… नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते… एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत रहा… एकमेकांना सांभाळून घ्या… आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत.. सगळ्यांची काळजी घ्या… आणि मी एवढं प्रेमाने बोलूनसुद्धा, एवढं छान लिहूनसुद्धा वेड्यासारखे वागलात, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा!!!! लै हानीन!!’