गोखले- कोळींच्या आनंदात सावनीने टाकला मिठाचा खडा; मुक्ता सागरसोबतचं लग्न मोडणार..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीआरपीच्या यादीत सर्वात अव्वल ठरलेली स्टार प्रवाहची मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सध्या तुफान चर्चेत आहे. या मालिकेत येणारे दररोजचे ट्विस्ट कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या या मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखले यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. चिमुकल्या सईच्या आनंदासाठी सागर आणि मुक्ता लग्न करायला तयार झाले आहेत. मात्र त्यांच्या लग्न मंडपात सागरची पूर्वपत्नी सावनी येते आणि एक मोठा खुलासा करते. केवळ सई नव्हे तर सागर आणि सावनी यांना एक मुलगादेखील असल्याचे ती सांगते.

आतापर्यंत आपण पाहिलं कि, सागर आणि मुक्ताच्या लग्नाचे विधी सुरु असताना सावनी अचानक लग्न मंडपात येऊन धडकते. यानंतर ती मुक्ताने सागर सोबत लग्न का करू नये यासाठी अनेक गोष्टी सांगू लागते. ज्यामध्ये ती आपल्या मुलाचे सत्य उघड करते. सागरने आपल्या लहान मुलाला खूप मारल्यामुळे कोर्टात त्याने वडिलांविरुद्ध साक्ष दिल्याचे ती मुक्ताला सांगते. सागर- सावनीच्या ११ वर्षीय मुलाबाबत ऐकून मुक्ता सागरला जाब विचारू लागते. यावेळी मुक्ता, मुलाला मारलं तसं उद्या सईला देखील मारशील असा सागरवर आरोप करते. तसेच सईने सागरकडे नव्हे तर सावनीकडे रहायला हवं असं म्हणते.

सागर मुक्ताला समजावण्याचा प्रयत्न करतो कि त्याने त्याच्या मुलाला मारलेलं नाही. पण मुक्ता स्पष्टपणे त्याच्यावर विश्वास नसल्याचे सांगते आणि लग्न मंडपातून लग्न तोडून निघून जाते. यावेळी इंद्रा कोळी सावनीवर चिडते. मात्र, सावनी सर्वांच्या हतबल होण्याची खिल्ली उडवू लागते. तिथे उपस्थित प्रत्येकजण आता पुढे काय होणार..? अशा प्रश्नार्थक भावाने पाहत असतो. आता पुढे काय होणार..? सावनीचा डाव यशस्वी होणार..? मुक्ता- सागरचं लग्न मोडणार..? का आणखी काही ट्विस्ट पहायला मिळणार…? हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पहा.