अश्विनी वाघमारे घेणार प्रेक्षकांचा निरोप; झी मराठीची ‘तू चाल पुढं’ मालिका ऑफ एअर होणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका गेल्या काही महिन्यात लागोपाठ प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसलय. अजूनही मालिका बंद होण्याचा पाढा सुरूच आहे. गेल्या २०२३च्या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या दोन मालिका ऑफ एअर झाल्या. या मालिकांचा टीआरपी इतर मालिकांच्या तुलनेत कमी असल्यामुळे वाहिनीने हा निर्णय घेतला. यानंतर आता झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे.

‘तू चाल पुढं’ ही मालिका ऑगस्ट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब- चौधरी पुन्हा एकदा मराठी मालिका विश्वात झळकत होती. शिवाय आदित्य वैद्य, धनश्री काडगांवकर, प्रतिभा गोरेगावकर, देवेंद्र दोडके अशी जबरदस्त स्टारकास्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. या मालिकेचे कथानक एका सामान्य गृहिणीभोवती फिरणारे आहे.

जी एक मुलगी, बहीण, बायको, सून, आई, वहिनी, मैत्रीण अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःच्या स्वप्नांना ध्यास घेते आणि तिचा नवा प्रवास सुरु होतो. जो खडतर मात्र तिच्यातील विश्वास वाढवणारा ठरतो. या कथानकातील अश्विनी वाघमारे हे मुख्य पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं.

शिवाय श्रेयस, शिल्पी, मयुरी, कुहू, विद्युत या सहाय्यक पात्रांनी देखील कमल केली. प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग झालेले हे कलाकार आता काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. हि मालिका अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे आणि येत्या १३ जानेवारी २०२४ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी मालिकेत शिल्पी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने सोशल मीडियावर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला होता. तेव्हापासून मालिकेचे प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान मनोरंजनात खंड पडू नये म्हणून नव्या मालिका सुरु होणार आहेत. ज्यांचे प्रोमो व्हायरल होत आहेत.