चला निरोप घेतो!! ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्याने शेअर केला सेटवरील भावुक क्षण; व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी गेल्या काही काळात प्रेक्षकांचा निरोप घेतल्या. काही मालिका कथानक पूर्ण करून संपल्या तर काही कमी टीआरपीमूळे बंद करण्यात आल्या. अशातच आणखी एक मालिका उद्या प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. हि मालिका म्हणजे ‘तू चाल पुढं’. या मालिकेत एका सामान्य गृहिणीचा प्रवास दाखवण्यात आला होता. मालिकेत अभिनेत्री दीपा परब चौधरी, आदित्य वैद्य, धनश्री कडगांवकर, प्रतिभा गोरेगावकर, देवेंद्र दोडके अशी स्टार कास्ट पहायला मिळाली.

एखादी मालिका निरोप घेते तेव्हा मालिकेशी जोडला गेलेला प्रेक्षक वर्ग कायम भावनिक होताना आपण पाहिला आहे. साहजिक अशावेळी मालिकेतील कलाकार देखील भावुक होत असतात. वर्षनुवर्षं मालिका सुरु असतात आणि अशावेळी मालिकेच्या सेटसोबत, क्रू टीमसोबत आणि खास करून प्रेक्षकांसोबत या कलाकारांचे एक भावनिक नाते तयार झालेले असते. असेच नाते या मालिकेतील कलाकारांचे प्रेक्षकांशी जोडले गेले. त्यामुळे निरोप घेताना कलाकार मंडळी प्रचंड भावुक होताना दिसली. अभिनेता आदित्य वैद्यने हा भावुक क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या मालिकेत अश्विनीचा पती म्हणजेच श्रेयस वाघमारे हि भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आदित्य वैद्यने सेटवरील शेवटच्या दिवसाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. आदित्य वैद्यने ‘ ”तू चालं पुढं”चा शेवटचा दिवस’ असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये आदित्यने सेटला शेवटचा नमस्कार केल्याचे दिसत आहे. आदित्यासोबत मालिकेतील बबन पांड्या म्हणजेच अभिनेता गणेश सरकटेदेखील दिसतो आहे. गणेश प्रचंड भावुक झाला असून त्याचे भरलेले डोळे सगळं काही बोलत आहेत. या व्हिडिओत आदित्यला मिठी मारून गणेश रडताना दिसतोय. तर शेवटी ‘चला निरोप घेतो…’ म्हणत आदित्य सेटला वाकून नमस्कार करून जाताना दिसतोय. या मालिकेचा शेवटचा भाग उद्या १३ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.