‘..आणि शिल्पीचा प्रवास संपला’; सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर करत धनश्रीने घेतला प्रेक्षकांचा निरोप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अनेक मालिकांनी गेल्या काही महिन्यात एका मागे एक प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये ‘लोकमान्य’, ‘३६ गुणी जोडी’, ‘लवंगी मिरची’, ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘तू चाल पुढं’ या मालिकांचा समावेश आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेचा शेवटचा भाग १३ जानेवारी २०२४ रोजी प्रसारित झाला आणि या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. निरोप घेताना मालिकेचे कलाकार आणि प्रेक्षक अत्यंत भावुक झाले होते. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचे मन जिंकले. ज्यामध्ये शिल्पी या खलनायकी पात्राचा देखील समावेश आहे.

या मालिकेत अभिनेत्री दीपा परब मध्यवर्ती भूमिकेत पहायला मिळाली. तिच्या भूमिकेचे नाव अश्विनी असे होते. तर म्हात्रे घराण्याची लेक आणि वाघमारे कुटुंबाची सून अशा सर्वसामान्य गृहिणीची हि गोष्ट सुफळ संपूर्ण झाली. मालिकेतील अश्विनी, श्रेयस, मयुरी, कुहू, बबन पांड्या, विद्युत, शिल्पी या प[रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. यातील शिल्पी हे या मालिकेतील खलनायकी पात्र अभिनेत्री धनश्री कडगांवकरने साकारले होते. मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर करत शिल्पीने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

अभिनेत्री धनश्री कडगांवकरने ‘तू चाल पुढं’ मालिकेच्या सेटवरील शेवटचा दिवस आणि शेवटच्या सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘…आणि इथे शिल्पीचा प्रवास संपला’. धनश्रीच्या या व्हिडीओवर मालिकेच्या प्रेक्षकांनी आणि कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. धनश्रीच्या या व्हिडीओवर कमेंट करताना मालिकेच्या प्रेक्षकांपैकी एकाने लिहिले आहे कि, ‘शिल्पी म्हात्रे, आम्हाला तुझी खूप आठवण येईल’. एक खलनायकी पात्र देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकते हे या भूमिकेतून अभिनेत्री धनश्री कडगांवकरने दाखवून दिले आहे