आदेश देणाऱ्यांना लाथ घालावी वाटली नाही..? अभिजीत केळकरने ‘त्या’ पोस्टसाठी पुष्कर जोगचे टोचले कान


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात जातीय सर्वेक्षण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. दरम्यान मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्याही घरी काही महिला कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. आपल्याला जातीसंदर्भात विचारपूस केल्यामुळे दोघांनीही सोशल मीडियावर आगपाखड केली. पुष्कर जोगने ‘सर्वेक्षणासाठी आलेली बाई नसती तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या..’ असे विधान केल्यानंतर मोठा वाद उफाळला.

पुष्करच्या या विधानावर महापालिका कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि काही कर्मचारी संघटनांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. यावर पुष्करने माफी मागितली आणि हा वाद थांबण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. दरम्यान या प्रकारावर अभिनेता अभिजीत केळकरने फेसबुक पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. हि पोस्ट शेअर करताना त्याने लिहिलंय, ‘प्रिय मित्र पुष्कर जोग यांस, मित्रा, तुझी चर्चेत असलेली, वादग्रस्त पोस्ट वाचली, ती सोशल मीडियावर होती त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच… मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे, माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती…तिच्याबरोबर, तिला, तिच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण या कामात अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे. मदत केली आहे… उन्हातान्हात, पावसात सुध्दा फिरून, ही कामं करावी लागतात, वरून आदेश आला की, त्याची अंमलबावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं, दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात, ते काही त्यांच्या मनातले नसतात…तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात…’

१. घरी आलेल्या अशा या कर्मचाऱ्यांना लाथ घालावी असं तुला का वाटलं असेल? ते सरकारी कर्मचारी आहेत, ते आपलं काम करत आहेत असा विचार तुला करावासा का वाटला नसेल?

२. आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा? अगदी आपण कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज का वाटावी? जात म्हणजे काही आपण केलेलं वाईट काम किंवा चोरी नाही ज्याची आपल्याला लाज वाटावी, किंवा त्यात अभिमान बाळगावा असंही काही नाही कारण त्यात आपलं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नाही, ती आपणहून आपल्याला येऊन चिकटते, कितीही हवी किंवा नको म्हटली तरीही, बरोबर ना?

३. सर्वेक्षण हा सरकारचा निर्णय आहे, सरकारने काढलेला आदेश आहे, त्यामुळे तुला इतकाच राग आला आहे तर थेट त्यांच्याच लाथ घालावी असं का वाटलं नसेल? (मुळात लाथ घालावी हा शब्दप्रयोगच वाईट/चुकीचा आहे)गेला बाजार, त्याच लोकांना हे प्रश्न तू का विचारले नसशील? हल्ली पंतप्रधानांपासून ते नगरसेवकापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे हे सोशल मीडियावर active असलेल्या तुला माहीत असेलच, मग तो राग तिथे त्यांच्यावर का काढला नसशील?

४. समजून चालू घरी आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लाथ घातली असतीस? तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं?

आपण कलाकार आहोत, लोक आपल्याला रोज बघतात. आपल्यावर, आपल्या कलाकृतीवर अतोनात प्रेम करतात, आपलं बोलणं, वागणं फॉलो करतात, त्यामुळे जबाबदारीने वागणं, बोलणं हे आपलं कर्तव्य आहे… मी महानगरपालिका शिक्षिकेचा मुलगा असल्यामुळे तू जे बोललास ते मला फारच लागलं, त्यांचं अतिशय वाईट वाटलं, रागही आला…तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं त्यामुळे आता तू काय करायला हवं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही…ते केलंस तर लोभ आहेच तो तसाच राहील… तुझा मित्र/शुभचिंतक’. अभिजीतच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत आपले मत मांडले आहे. शिवाय पुष्करने देखील दिलगिरी व्यक्त केली आहे.