‘नवरा झालो तरी मी किरकोळच राहणार’; ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा आशु बोहल्यावर चढणार..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर अत्यंत गाजलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ संपून बरीच वर्ष झाली. पण अजूनही या मालिकेतील कलाकार आणि त्यांच्या भूमिकांवर प्रेक्षक तितकंच प्रेम करत आहेत. अलीकडेच या मालिकेत मीनल हे पात्र साकारलेल्या अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा साखरपुडा दणक्यात पार पडला. यानंतर मालिकेतील आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर याच्या लग्नाबाबत विविध चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत त्याने लग्नाच्या प्लॅनिंगबाबत भाष्य केले आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत आशुतोष शिवलकर म्हणजेच आशु ही भूमिका साकारणारा अभिनेता पुष्कराज चिरपुटकरने कला विश्वात स्वतःच्या अभिनयाची एक अल्लग छाप सोडली आहे. विविध मालिका, चित्रपट यांमधून तो कायम वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारताना दिसला आहे. पण त्याची खरी ओळख ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतूनचं प्रेक्षकांना झाली. दरम्यान मालिकेतील इतर कलाकारांनी आपापले साथीदार निवडलेले असताना आशुतोष म्हणजे पुष्कराज लग्न कधी करणार याबाबत त्याला वारंवार विचारणा केली जाते. याबाबाबत बोलताना पुष्कराजने एकदम हटके प्रतिक्रिया दिली आहे.

त्याच काय आहे, पुष्कराजचं नुकतचं ‘किरकोळ नवरे’ नावाचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकात त्याच्याबरोबर अनिता दाते आणि सागर देशमुख मुख्य भूमिकेत आहे. यानिमित्त एका मुलाखतीत बोलताना पुष्कराज म्हणाला कि, ‘माझा सध्या लग्नाबाबत सध्या विचार नाहीये. नवरा व्हायच आहे की नाही हे कळत नाहीये. किरकोळ मी कधीही असतोच. कोणाच्याही आयुष्यात गेलो तरी मी किरकोळ असतोच हे मी मान्य केलं आहे. त्यामुळे नवरा झालो तरी मी किरकोळच होणार यात काही शंका नाही.’