तेजश्री पुन्हा लग्न करणार..? घटस्फोटाच्या 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच व्यक्त केली दुसऱ्या लग्नाची इच्छा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका, चित्रपट माध्यमातून तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ अशा मालिकांमधून तेजश्रीने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत तेजश्री आणि शशांक केतकर यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. पुढे जाऊन त्यांनी खऱ्या आयुष्यात लग्न केले पण काही काळातच विभक्त झाले. यानंतर आता तेजश्रीने दुसऱ्या लग्नाची इच्छा व्यक्त केली आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. मात्र काही काळातच ते एकेमकांपासून वेगळे झाले आणि आपापल्या आयुष्यात रममाण झाले. दरम्यान, घटस्फोटाच्या ९ वर्षांनंतर आता तेजश्रीने पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शशांकसोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर तेजश्री तिच्या कामात मग्न झाली. मात्र आता तिने एका मुलाखतीत पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय नवऱ्यामध्ये कोणते गुण असावेत याबाबत देखील तिने खुलासा केला आहे. तेजश्री म्हणाली, ‘एखाद्याच्या आयुष्यात चढ- उतार येतात तेव्हा आपण कोलमोडतो, थांबतो, ब्रेक घेतो. मी शेवटी स्वत:ला समजावलं की नीट राहायचं असेल तर काम करणं गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की, मी करिअरकडे जास्त लक्ष देते. अनेक जणांकडून मी माझ्याबाबत अशा पद्धतीची वाक्यही ऐकली आहेत’.

‘लग्नासाठी मला फार स्थळं येत नाहीत. मला कुटुंब आवडतं. मला कुटुंब हवं आहे. मला लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की, वयाच्या २४- २५ व्या वर्षी मी तो निर्णय घेतला. पण, मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचं आहे. त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की लगेच मी लग्न करण्याचा निर्णय घेईन. लग्न या शब्दाचा आदर करणारा, जबाबदार, शांत, माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे. कारण मला बोलायला आवडतं. मी पार्टी करणारी मुलगी नाही, मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो’. तेजश्रीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर शशांकने २०१७ साली प्रियांका ढवळेबरोबर लग्न केले. मात्र तेजश्री अद्याप अविवाहित आहे.