‘रमा राघव’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; लग्नानंतर सोडली मालिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनल पवारचं नुकतंच मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी सोनलने तिचा अनेक वर्षांपासूनचा मित्र समीर पालुष्टेसोबत लग्नगाठ बांधली. सोनल आणि समीरचा लग्नसोहळा अत्यंत जंगी पद्धतीने पार पडला. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर सोनलने तिच्या लग्नाआधीचे विधी मेहंदी, हळद व संगीत सोहळ्याचे अनेक फोटो तसेच व्हिडीओ शेअर केले होते. याशिवाय तिच्या लग्नाचे देखील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

लग्नाआधी अभिनेत्री सोनल पवार हि ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘रमा राघव’ या मालिकेत अश्विनी हे निगेटिव्ह पात्र साकारत होती. मात्र लग्नानंतर तिने मालिकेतून एक्झिट घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे गेल्या काही भागांपासून ‘रमा राघव’ मालिकेत अश्विनीच्या भूमिकेत एक नवी अभिनेत्री दिसते आहे. सोनल पवारच्या जागी आता ‘रमा राघव’ मालिकेतील अश्विनी हे पात्र अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे साकारताना दिसते आहे. यानुसार आता ‘रमा राघव’ मालिकेत पुढे भाग्यश्रीचं हे खलनायिकेचं पात्र साकारताना दिसणार आहे.

अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यापूर्वी तिने ‘कलर्स मराठी’च्या ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ तसेच स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय तीने ‘तान्हाजी’ या बॉलीवूड चित्रपटात सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिकादेखील साकारली होती. यानंतर आता ‘रमा राघव’ या मालिकेत ती पहिल्यांदाच खलनायकी पात्र साकारताना दिसते आहे. मालिकेत नुकतंच रमा आणि राघवचे लग्न झाले आहे. तर अश्विनीला मात्र त्यांचा सुखी संसार काही बघवत नाहीये. त्यामुळे ती काही ना काही कुरघोड्या करताना दिसणार आहे.