‘… आणि स्वामी बोलावून घेतात’; अमृता खानविलकरने सांगितला दैवी कृपेचा अनुभव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयात अमृता जितकी उत्तम आहे तितकीच उत्तम ती नृत्यात देखील आहे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून अमृताने जेव्हढं नाव कमावलं आहे तितकीच लोकप्रियता तिने एक नृत्यांगना म्हणून देखील मिळवली आहे. सध्या अमृता ‘गणराज गजानन’ या नव्या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी ‘गणराज गजानन’ हे गाणं गायलं आहे. या गाण्याच्या प्रमोशननिमित्त अमृता टीव्हीवरील वेगवेगळ्या मालिकांमध्ये येताना दिसत आहे. दरम्यान तिने एका एंटरटेन्मेंट माध्यमाशी संवाद साधला. यावेळी तिने स्वामी समर्थांच्या प्रचितीचा अनुभव सांगितला. ‘गणराज गजानन’ या गाण्यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत अमृता खानविलकरला विचारलं गेलं की, ‘तुझ्या आयुष्यात स्वामींचं किती महत्त्व आहे..?’ यावर क्षणाचाही विलंब न करता अमृता म्हणाली की, ‘मला असं वाटतं ज्यांना आयुष्यात खूप चमत्कार बघायचे असतात ना. तर ते स्वामी चरणी जातात आणि स्वामी बोलवून घेतात’.

‘तुम्ही फक्त त्यांचा जप करा. त्याचं असं काहीच नसतं की, खूप मोठी पूजा वगैरे घाला. तुम्ही जितकं स्वामीचं मनाने करालं, तितकं आहे. माझ्या पडत्या आणि माझ्या अवघड काळात स्वामींनी मला बोलवून घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही. मी जिकडे राहत होती, अगदी तिकडेच काही अंतरावर स्वामी समर्थांचं मठ होतं. मी अनेकवर्ष दररोज मठात गेलीये. त्यांची जी शक्ती आहे, ती विलक्षण आहे. ती फक्त तुम्ही अनुभवू शकता. ती सांगू शकत नाही. माझ्याबरोबर काय झालं? मला त्यांनी कुठल्या गोष्टींमधून बाहेर काढलंय?, असं सांगता येत नाही. स्वामींची शक्ती फक्त जाणवू शकते’.