सुभेदार कुटुंबीय आणि प्रतिमाची भेट होणार..?; सायलीच्या अपघातानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली हि मालिका टीआरपीच्या शर्यतीत चांगलाच जोर धरून आहे. यामध्ये जुई गडकरी मुख्य भूमिकेत असून मालिका चांगलीच रंगात आली आहे. सध्या चालू कथानकानुसार, मालिकेतील मुख्य पात्र सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. सायली हॉस्पिटलमध्ये असताना अर्जुनच्या जीवाची होणारी घालमेल त्यांच्या नात्याला वेगळं वळण देणार असं दिसत आहे. शिवाय प्रतिमांच्या एंट्रीनंतर कथानकात मस्त ट्विस्ट आला आहे.

https://www.instagram.com/reel/CyFURx0Jt81/?utm_source=ig_web_copy_link

प्रोमोनुसार, सायलीवर हल्ला झाल्यामुळे अर्जुन आणि सुभेदार कुटुंबीय प्रचंड अस्वस्थ आहेत. दरम्यान, कुसुम आणि प्रतिमा यांचा काहीही परिचय नसल्याने या दोघींची भेट गेल्या भागात दाखवण्यात आली. कुसुम प्रतिमाला उपचारासाठी रुग्णालयात नेते आणि तिथे सायलीला रक्ताची गरज असल्याचे समजते. सायलीचा रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ असल्याने तिला रक्त कोण देणार..? असा सवाल उभा राहतो. मात्र सायलीची अर्थात खऱ्या तन्वीची खरी आई प्रतिमाचा रक्तगट लेकीसोबत जुळतो. त्यामुळे मोठं संकट टळतं.

याचवेळी दुसरीकडे, प्रतिमा हातवारे करून बोलत असल्याने कुसुम ‘तुम्हाला बोलता येत नाही का..?’ असा प्रश्न विचारते. यावर प्रतिमा नाही म्हणून मान डोलावते. अपघातानंतर प्रतिमाची वाचा गेल्याचे समोर येते. दरम्यान सायलीला रक्त देऊन प्रतिमा जेव्हा माघारी निघते तेव्हा समोरून कल्पना, अर्जुनचे वडील आणि रविराज किल्लेदार म्हणजेच प्रतिमाचा नवरा समोर चालत येत असल्याचे ती पाहते. यावेळी सुभेदार कुटुंबीय आणि प्रतिमाची भेट होणार का..? तिला पाहून सुभेदार काय प्रतिक्रिया देणार..? हे येत्या भागात पहायला मिळणार आहे.