मुली खरंच स्वतंत्र आहेत का..? अश्विनी महांगडेची ‘ती’ शॉर्ट फिल्म चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध कारणांमुळे ती कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. गेल्या अनेक महिन्यांपासून ती स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये ‘अनघा’ हे पात्र साकारताना दिसते आहे. याशिवाय तिने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून माईंची भूमिका साकारली होती. अश्विनी अभिनय क्षेत्राइतकीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. अशातच तिने एक शॉर्ट फिल्म शेअर केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.

नुकतीच अश्विनी महांगडे एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली आहे. हि शॉर्ट फिल्म मुलींच्या जीवनावर आधारित आहे. दररोज कामावर जाणाऱ्या मुलीचा रस्त्यावरील गुंडांकडून होणारा छळ, तिला होणार त्रास आणि त्यानंतर ती मुलगी या अन्यायाविरुद्ध कशी आवाज उठवते..? हे या शॉर्ट फिल्ममध्ये पहायला मिळत आहे.या शॉर्ट फिल्मचे लेखन भाग्यशाली राऊत यांनी केले आहे. यातून लेखिकेने मुलींना आत्मसंरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

या शॉर्ट फिल्मच्या शेवटी ‘महिलांची छेडछाड करणे’ हा भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार गुन्हा असून ३५४ नुसार गुन्हा आहे. यामध्ये १ वर्षांपासून ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अश्विनीने हि शॉर्ट फिल्म सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे कि, ‘या शॉर्ट फिल्मची सुरुवात जरी मी आणि भाग्यशालीने केली असली तरी यात काम करणारे आणि या प्रवासात आमच्यासोबत असणाऱ्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली आहे’. यासोबतच अश्विनीने ही पोस्ट शॉर्ट फिल्ममधील मुख्य कलाकारांना टॅग करत लिहिलं, ‘१५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन, मुली खरंच स्वतंत्र आहे का?’ या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत शॉर्टफिल्मच्या विषयाचे कौतुक केले आहे.