मराठी साहित्य क्षेत्राला मोठा धक्का! लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; कणेकरी आवाज हरपला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ पत्रकार, सुप्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी प्रकृती खालवल्यामुळे गिरीश कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि कणेकरी आवाज हरपला. शिरीष कणेकर हे एक निर्भीड पत्रकार असून ते सिनेमा, क्रिकेट, साहित्य आणि राजकारण या विषयांवर लिखाण करायचे. शिरीष कणेकर यांची ‘माझी फिल्लमबाजी’, ‘कणेकरी’ ही पुस्तके सर्वात लोकप्रिय आहेत. आपल्या खास शैलीतून आणि टोकदार लिखाणातून ते आपले वेगळेपण नेहमीच सिद्ध करत असत.

शिरीष कणेकर यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील पेण होते. त्यांचे वडील हे एक रेल्वेमध्ये डॉक्टर होते. गिरीश कणेकर यांनी पत्रकार क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर एक प्रसिद्ध लेखक आणि कथाकथनकार म्हणून आपली ओळख निर्माण केली. शिरीष कणेकर यांना आपल्या कामगिरीमुळे पत्रकार आणि लेखन क्षेत्रातील अनेक पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले आहेत. शिरीष कणेकर यांची ओळख शैलीदार लेखक, फिल्मी गप्पांची मैफल रंगवणारे वक्ते अशीदेखील होती. शिवाय वृत्तपत्रांमध्ये सिनेमा, क्रिकेट, राजकारण, साहित्य यांचे स्तंभलेखन आणि ‘कणेकरी’, ‘फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ यातून त्यांनी विनोदी लेखन करत एक वेगळी शैली उमटवली.

आपल्या खास शैली मधून टोकदार लेखन करणाऱ्या शिरीष कणेकर यांना ‘कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कार’ मुंबई पत्रकार संघातर्फे देण्यात आला होता. तसेच सर्वोत्कृष्ट वाङ्‌मयाचा पुरस्कार त्यांना ‘सूरपारंब्या’ या लेखसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून त्यांना उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार देखील देण्यात आला होता. अशा अनेक पुरस्कारांचे शिरीष कणेकर मानकरी ठरले होते. आज त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.