‘बाजार उठवीन तुमचा..’; ‘शुभविवाह’ मालिकेत निळू फुलेंच्या लेकीची दमदार एंट्री


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्याचा जणू एक भाग असतात. दैनंदिन जीवनातील विरंगुळा म्हणून प्रेक्षक आवर्जून वेगवेगळ्या मालिका पाहतात. मालिकेचे कथानक, त्यातील कलाकार हे आपसूकच प्रेक्षकांसाठी महत्वाचे होऊन जातात. अशीच एक प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘शुभविवाह’ आता अत्यंत वेगळ्या आणि रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मुख्य म्हणजे या वळणावर एका नव्या पात्राची दमदार एंट्री झाली आहे. या पात्राचे नाव आहे ‘सावित्री शिंदे’. हि भूमिका दिवंगत अभिनेते निळू फुले यांची लेक आणि अभिनेत्री गार्गी फुले- थत्ते’ साकारत आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ हि मालिका अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट हे कायम प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतात. अलीकडेच मालिकेत सायकल राणी म्हणजेच भूमी आकाशला घेऊन त्यांचे अलिशान घर सोडून बाहेर पडताना दिसली. नवं घर शोधताना ती सावित्री मनोहर शिंदे यांच्या घरापर्यंत येऊन थांबली आणि बेल वाजवताच त्यांनी दरवाजा उघडला.

भूमी म्हणाली, ‘आम्हाला घराची खूप गरज आहे’. यावर सावित्री म्हणाल्या, ‘घर वगैरे काही मिळणार नाही.. निघा.. चला…’. तर भूमी म्हणते, ‘आता तुम्हीच सांगा इतक्या रात्री मी याला घेऊन कुठे जाऊ?’ यावर सावित्री म्हणतात, ‘तू तर अजिबात बोलू नको माझ्याशी…आगाऊ मुली डोक्यात जातात माझ्या…हा…उपाशी मेले तरी चालेलं पण घर तुम्हाला देणार नाही…’.

दुसऱ्या प्रोमोत भूमी आणि आकाश रस्त्याकडेला थांबलेले दिसत आहेत. भूमी आकाशला जेवण भरवत असताना तो म्हणतो, ‘तू बघ आपणच जिंकणार या गेममध्ये’. अशावेळी दोघांना एकटं पाहून काही हुल्लडबाज त्यांना त्रास देऊ लागले. भूमी आकाशला घेऊन निघू लागते. तर ते हुल्लडबाज दोघांना अडवतात. भूमी म्हणते, ‘सोडा म्हटलं ना मी तुम्हाला’. तर त्यातील एक म्हणतो ‘… आणि नाही सोडलं तर’.

यावर सावित्री यांची एंट्री होते आणि त्या म्हणतात, ‘गाठ माझ्याशी आहे.. बाजार उठवीन हा तुमचा लक्षात ठेवा हा’. यावेळी त्यांच्या हातात कोयता आणि डोळ्यात राग स्पष्ट दिसतोय. दरम्यान, ‘शुभविवाह’मध्ये गार्गी फुले यांची अशी दमदार एंट्री मालिकेत नवा ट्विस्ट आणणार हे नक्की. आता येत्या भागात समजेल कि, सावित्री मनोहर शिंदे नक्की कोण आहेत आणि त्यांनी भूमी- आकाशला आसरा देण्यासाठी नकार का दिला..?