‘रमा राघव’ मालिकेतून गौतम जोगळेकरांनी घेतला ब्रेक; व्हिडिओतून केले कारण स्पष्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा राघव’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या लोकप्रियतेमूळे तग धरून आहे. टीआरपी कमी असल्यामुळे खरंतर या मालिकेचा देखील पत्ता कट होणार होता. लवकरच ‘रमा- राघव’ मालिका बंद होणार अशा बातम्यांनी देखील जोर धरला. पण पुढे कथानकातील वळणे पाहून प्रेक्षकांनी मालिकेला चांगला प्रतिसाद दिला आणि हि मालिका सुरु राहिली. मालिकेतील रमा आणि राघव यांची लव्हस्टोरी आता चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांच्या लग्नाच्या बोलणीचा उत्कंठावर्धक टप्पा सुरू आहे आणि असे असताना मालिकेतील एका नायकाने ब्रेक घेतल्याचे समोर आले आहे.

या मालिकेतील गिरीश परांजपे अर्थात रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते गौतम जोगळेकर आता मालिकेतील पुढील भागात दिसणार नाही असे समोर येत आहे. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतल्याचे समजत आहे. रमा राघवच्या ऑफिशियल पेजवर त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत गौतम जोगळेकर यांनी मालिकेतून ब्रेक घेतल्याचे सविस्तर कारण सांगितले आहे. तर त्यांच्या जागी आता गिरीश परांजपे ही भूमिका श्रीरंग देशमुख साकारणार आहेत.

गौतम जोगळेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांच्या मालिकेतून अचानक ब्रेक घेण्याचे कारण सांगितले आहे. गौतम जोगळेकरांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याची सर्जरी करायची असल्याने त्यांना मालिकेतून ब्रेक घ्यावा लागत असल्याचे यात सांगितले आहे. गिरीश परांजपे या भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले त्यासाठी गौतम जोगळेकर यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत. तसेच आता रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे श्रीरंग देशमुख हे त्यांचे मित्र असून त्यांनाही तितकंच प्रेम द्या असं आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केलं आहे.