‘… आणि डोकं सुन्नं झालं’; इर्शाळवाडी दुर्घटनेची बातमी पाहून मराठी अभिनेत्री झाली भावूक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीत बुधवारी रात्री दरड कोसळल्याची बातमी समोर आली. या बातमीने सर्वांचं मन सुन्न झालंय. आतापर्यंत या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली जवळपास ३० कुटुंब अडकल्याची माहिती समोर आली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेबाबत अभिनेत्री जुई गडकरींच्या हळहळ व्यक्त केली आहे.

मराठी अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने जेव्हा कुटूंबासोबत इर्शाळगडावर गेली होती तेव्हाचे फोटो पोस्ट केले आहेत. सोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले ते कि, ‘इर्शाळगडावर गेलो तेव्हाच्या काही आठवणी… सकाळपासुन इर्शाळवाडी वर दरड कोसळल्याची बातमी बघतेय आणि डोकं सुन्नं झालय… तिथल्या आऊच्या हातचा स्वयंपाक अजुनही आठवतोय… एव्हढ्या ऊंचावर असलेली ठाकरवाडी… विज नाही.. मेडीकल, जिवनावश्यक वस्तु असं वरती ठाकरवाडीत काहीच नाही.. तरीही सदैव चेहरा हसरा… कसं काय जमतं त्यांना..?’

पुढे लिहिलंय, ‘प्रत्येक वेळेला १- १.३० तास चढुन वर जाणं किती अवघड ए… पण तरीही कसलीही complaint नं करता खुप कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं… माझ्या खुप जवळचा विषय आहे ठाकरं आणि ठाकरवाड्या… कितीतरी वाड्यांवर मी फिरलिये… त्यांच्या हातचं चविष्ठं जेवलिये… बातमी बघुन खुप वाईट वाटलं… सगळे सुखरुप असुदेत’. माहितीनुसार, या गावाची एकूण लोकसंख्या २२८ असून ही ४८ कुटुंबांची वाडी होती. आतापर्यंत ५७ लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. तर ६०- ७० लोक गावाबाहेर होते. मात्र अजूनही अनेक लोक या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे.