‘सुख म्हणजे…’ मालिकेला मल्हारचा निरोप; भावुक होत म्हणाला, ‘साडे तीन वर्षांचा प्रवास थांबला…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोमवारपासून या मालिकेची पुढील कथा सुरु झाली आहे. ज्यानुसार आता मालिकेच्या कथानकाने २५ वर्षे पुढे उडी घेतली आहे. त्यानुसार मालिकेच्या नव्या कथेत जयदीप- गौरीचा पुनर्जन्म दाखवण्यात आला असून आता अधिराज- नित्याच्या प्रेमाचा अध्याय सुरु होणार आहे. दरम्यान, मालिकेतील काही जुन्या पात्रांची एक्झिट झाली आहे. ज्यामध्ये मल्हार अर्थात अभिनेता कपिल होनरावचा समावेश आहे. तर मालिकेचा आणि प्रेक्षकांचा निरोप घेताना त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता कपिल होनराव याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने लिहिलं कि, ‘९०० प्लसच्या वर एपिसोड, साडेतीन वर्षांचा प्रवास काल थांबला. सुख म्हणजे नक्की काय असतं..? या मालिकेनं जे सुख मला दिलंय, ते मी शब्दांत मांडू शकणार नाही. नाव, ओळख, प्रसिद्धी, यश सगळं सगळं या एका मल्हारनं कपिलला दिलंय. मल्हार असा इतका साधा माणूस असतो हेच सुरुवातीला मला पटत नसे’.

‘पण, हळूहळू त्याचा समजूतदारपणा, त्याचा साधेपणा, सगळं या कशाचीही अपेक्षा न ठेवता प्रेम करणं. कमी बोलणं हे नंतर स्क्रीनवर करता करता आवडू लागलं. मल्हार जरी आता नसला तरी त्याचे हे सगळे चांगले गुण कायम आता माझ्यासोबत असतील. तुम्ही प्रेक्षकांनी मला जे भरभरून प्रेम दिलंय त्याचा मी कायमचा ऋणी असेल. तुमचे लाख लाख आभार! असंच तुमचं प्रेम कायम असू द्या. मला ही संधी दिली त्याबद्दल ‘स्टार प्रवाह’चे खूप आभार. ‘कोठारे व्हिजन’चेही खूप आभार. भेटू लवकरच नवीन रूपात नवीन वेशात. सर्वांचा खूप आभारी आहे’.

मल्हारच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका आता रात्री ९.३० ऐवजी १० वाजता प्रसारित होत आहे.