‘गावासमोर नग्न करून..’; ‘जवान’मध्ये दलित शेतकऱ्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यासाठी मानेंची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक तर कधी अन्य विषयांवर ते पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकतीच किरण मानेंनी अधिकृत सोशल मीडिया फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये अत्यंत लहान मात्र प्रभावी भूमिका साकारणाऱ्या ओंकारदास माणिकपुरी या अभिनेत्याचे कौतुक केले आहे. या चित्रपटात त्याने एका शेतकऱ्याची भूमिका केली आहे.

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ”’जवान”मध्ये एका दलित शेतकऱ्याला छितपुट कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या बायको, मुलीसमोर आणि गावासमोर नग्न करून मारहाण केली जाते. ट्रॅक्टर ओढून नेला जातो. तरीही तो रडणार्‍या बायकोवर खेकसतो, ”तोंड बंद ठेव. पोरीची परीक्षा आहे ना..?” रडणार्‍या मुलीला शांत करत, ”काही विशेष नाही गं त्यात. माझीच चूक होती. तू जा. पेपर दे नीट”, असं म्हणत मुलीला परीक्षा देण्यासाठी पाठवतो आणि स्वत:ला गळफास लावून घेतो. यानंतर पिच्चरमध्ये शाहरूख आपल्याला भानावर आणतो’. देशातल्या शेतकर्‍यांचं वास्तव सांगतो. नंतर पिच्चरभर तो अनेक रूपांत जलवा दाखवतो. विजय सेतूपती आग ओकतो. नयनतारा लख्खपणे चमकते. दिपीका पदुकोण सुखावून जाते. अनेक अनेक कलाकार येऊन जातात. तरीही एवढ्या मोठ्या तगड्या, चकचकीत स्टारकास्टमध्ये या सिनमधला हा साधासुधा शेतकरी, त्याचा केविलवाणा तरीही स्वाभिमानी चेहरा प्रेक्षकांच्या मनामेंदूवर कोरला जातो… नीट लक्षात राहतो. एवढा प्रभावी अभिनय या अभिनेत्यानं केलाय’.

‘ओंकारदास माणिकपुरी असं या अभिनेत्याचं नांव. छत्तीसगढमधल्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब शेतकर्‍याचा पोरगा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानं गावाकडच्या ”नाटक मंडली”त काम करायला सुरूवात केली. ”नाच्या” म्हणून. उघड्या मैदानात होणार्‍या नाटकाला प्रेक्षक जमवण्यासाठी गाणी म्हणायची, जोक सांगायचे, मिमिक्री करायची, हे त्याचं काम. एक दिवस तो प्रख्यात नाट्य दिग्दर्शक हबीब तन्वीर यांच्या नजरेस पडला. तिथून पुढं त्यानं मागं वळून नाय पाहिलं भावांनो. उत्तरेकडच्या अभिजात नाटकांमध्ये त्याचं नाव आज लै मानानं घेतलं जातं. यापूर्वी तो आमिर खानच्या ”पीपली लाईव्ह” सिनेमातही आपल्याला दिसला होता. आपल्याकडे गावखेड्यांत तमाशातली वगनाट्यं, लोकनाट्यं, कलापथकं यात काम करणारे असे लै लै लै भन्नाट अभिनेते आहेत. ज्यांना योग्य दिग्दर्शकानं मार्गदर्शन केलं, एक संधी मिळाली तर ते त्याचं सोनं करतील. इरफान खान, नवाज, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी या उत्तरेकडच्या गांवातल्या पोरांनी जत्रेतल्या नाटकांपास्नं सुरूवात करून हे सिद्ध केलंय. ग्रामीण मातीतनं वर आलेल्या ओंकारदासला यापुढेही अशा अनेक संधी मिळोत. थिएटरचा पाया असलेले, अभिनयाला अतिशय गांभीर्यानं घेणारे असे पॅशनेट नट भारतीय सिनेमा समृद्ध करणार आहेत… गावखेड्यातल्या प्रतिभावानांना प्रेरणा देणार आहेत. सलाम ओंकारदास…कडकडीत सलाम!’