‘बालपणीपास्नं अस्पृश्यतेचे चटके…’; मराठी अभिनेत्याने ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त शेअर केलेली पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिकाविश्वात किरण माने यांचं नाणं खणखणीत वाजत आहे. अभिनयाच्या जोरावर त्यांनी विविध टीव्ही मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील ते कायम विविध विषयांवर पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमूळे ते कायम चर्चेत येताना दिसतात. आताही त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे जी व्हायरल होत आहे. किरण माने यांनी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त हि पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांनी केळुस्कर गुरूजी पात्र साकारले होते. तर आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्यांनी या पात्राबद्दलची माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होतेय. किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलंय, ‘…पहिलाच सिन होता. स्क्रीप्ट हातात आलं. दहाबारा वर्षांचा एक छोटा पोरगा रोज चर्नी रोड उद्यानात येऊन मनापास्नं अभ्यास करतो हे मी पहात असतो. त्याच्या वयाची इतर मुलं खेळण्यात गुंग असताना पुस्तकांत रमलेल्या या पोराविषयी माझ्या मनात कुतूहल चाळवतं… मी त्याच्याशी ओळख करून घेतो. बालपणीपास्नं अस्पृश्यतेचे चटके सोसलेला तो पोरगा सुरूवातीला थोडा बुजतो… मी मराठा आहे हे त्याच्या लक्षात येतं. तरीही खांद्यावर हात ठेवून आपुलकीने बोलणार्‍या माझ्याशी तो हळूहळू खुलून बोलू लागतो. मी त्याला महात्मा फुलेंचं ‘गुलामगिरी’ हे पुस्तक वाचायला देतो. त्या पोराचं नांव असतं ‘भिवा’… भिमराव रामजी आंबेडकर’!

‘मी ज्यांची भुमिका करत होतो, ते होते गुरुवर्य केळुस्कर गुरूजी. हो, तेच केळुस्कर गुरूजी ज्यांनी छ. शिवाजी महाराजांचं पहिलं ‘ऑथेंटिक’ चरीत्र लिहीलं होतं. हा सिन करताना माझा मी राहीलो नव्हतो. पुर्वी कधीतरी बाबासाहेबांची पुस्तकं वाचताना ज्या माणसाचा उल्लेख बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमानं, जिव्हाळ्यानं केलेला मी वाचला होता… छोट्या भिवाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बनवण्यात ज्या माणसाचा मोलाचा वोटा होता… ती भुमिका साकारायला मिळणं हे माझ्या दृष्टीनं अतिशय आनंद देणारं ठरलं ! केळुस्कर गुरूजींनी नंतर भिवाच्या शिक्षणासाठी जीवाचं रान केलं. परदेशी जायला शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे भिमरावाची शिफारस केली. …सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बाबासाहेब पहिल्यांदा बुद्धाकडे वळले ते केळुस्कर गुरूजींमुळे! तो सिन करताना मी भारावून गेलो होतो, ज्यावेळी मॅट्रिक पास झालेल्या भिवाचा सत्कार आयोजित करून केळुस्कर गुरूजींनी आशिर्वाद म्हणून त्याला स्वलिखित ‘गौतम बुद्ध यांचे चरित्र’ हे पुस्तक भेट दिले’.

‘… बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे की, “दादा केळूस्करांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात बुद्ध आणि त्यांचा धम्म यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती.” गुरूजींनी पुस्तक दिले तेव्हा भिवा सोळासतरा वर्षांचा होता. पुढे पन्नास वर्षे बाबासाहेबांनी सवड मिळेल तेव्हा गौतम बुद्धांचे चरित्र आणि तत्वज्ञान याचा अभ्यास केला…आणि अखेर या अभ्यासाचं फलित म्हणजे त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला! आज ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ ! आजच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर इथं बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. या घटनेला जो महान माणूस कारणीभूत होता, ती भुमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी अभिनयप्रवासाचं सार्थक करणार्‍या अनेक गोष्टींपैकी एक, खूप काळजाजवळची गोष्ट आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मंगलमय शुभेच्छा’, असे किरण माने यांनी म्हटले.