बये चाललीस..? कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संगीत देवबाभळी’चा प्रवास विसावणार; उद्या रंगणार शेवटचा प्रयोग


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन च्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा २२ डिसेंबर २०१७ रोजी शुभारंभ झाला. एकूण ६ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ची नाट्य दिंडी आता विसावणार आहे. उद्या बुधवार, २२ नोव्हेंबर २०२३ रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे या नाटकाचा शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.

हा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते. परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि प्रेक्षकांच्या साथीने तो यशस्वी झाला. कोरोनासारखं भयाण संकट येऊन गेलं पण त्यानंतरही प्रेखकांचं प्रेम कमी झालं नाही. याच प्रेमामुळे आज या नाटकाने सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही ‘देवबाभळी’ आता ५००’व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे.

‘देवबाभळी’ हे नाटक बंद करू नका… असा प्रेक्षकांचा आग्रह आहे. मात्र कुठेतरी थांबणं गरजेचं असतं म्हणत आता ही वारी ५०० व्या प्रयोगापर्यंत नेवून थांबते आहे. महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे मोठ्या दिमाखात सादर होणार आहे. अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत.

अशा सर्व मायबाप रसिकांसाठी ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे. तर कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला या विठू सावळ्या नाट्यकृतीसह हरीमय होण्यासाठी अवघे अवघे या!!!! ऐसा कार्तिकीचा सोहळा। चला जाऊ पाहू डोळा। म्हणत कलाकार मंडळींनी प्रेक्षकांना आमंत्रित केले आहे.