‘काल अयोध्येत आपणही असायलाच हवं होतं पण..’; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल संपूर्ण देशभरात अयोध्या राम मंदिर सोहळ्याचा उत्साह आणि चैतन्य पहायला मिळालं. अनेक कलाकार, क्रीडापटू, राजकीय. मंडळी, व्यावसायिक या नेत्रदीपक सोहळ्यासाठी अयोध्येत हजर राहिले होते. तर मराठी कलाकारांना आमंत्रण नसल्यामुळे कुणीच या ठिकाणी दिसलं नाही. पण प्रत्येकाने सोशल मीडियावर या सोहळ्याचा आनंद व्यक्त केल्याचे दिसले. दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळींनी या सोहळ्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होताना दिसते आहे.

या पोस्टमध्ये मिलिंद गवळींनी मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘कालचा दिवस फार मंगलमय होता, काल रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. काल बारा वाजून वीस मिनिटाच्या मुहूर्तावर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली, पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर, भारतात हिंदुस्थानात हा दिवस उजाडला. 4000 वेगवेगळ्या पंथाचे साधू संत तीन हजारांहुन अधिक vvip अतिथी, शंभरहून अधिक प्रायव्हेट जेट विमान, विमानांना एवढ्या पार्किंगची सोय नसल्यामुळे वेगळ्या राज्यात विमान पार्क केलेली होती’.

‘सुपरस्टार्स कलाकार, खेळाडू.. कालच्या दिवशी आयोध्येमध्ये आपण पण असायलाच हवं होतं असं असं मला पण वाटत होतं. पण नंतर विचार केला की, मला आमंत्रण दिलं नाही.. कारण माझ्या घरीच राम आहे. वडिलांचं नावच “श्रीराम” आहे. पण अयोध्येत आणि देशात हा उत्सव चालू असताना मी रामासारखं आपण आपलं कर्तव्य करत राहायचं असं ठरवलं. मी माझं काम म्हणजेच सध्या, “आई कुठे काय करते” या मालिकेचे शूटिंग करत होतो. सकाळी सेटवर पोहोचल्यानंतर नमस्कार गुड मॉर्निंगच्याऐवजी “जय श्रीराम“ म्हणत सगळे एकमेकांचं स्वागत करत होते. आमचे सीन्स पण किती interesting होते बघा, डॉक्टर अभी घर सोडून नोकरी करण्यासाठी कॅनडाला जातो आहे. तो परत केव्हा येईल कधी येईल, येईल की नाही याची कोणाला शाश्वती नाही आहे’.

‘त्याचा धाकटा भाऊ यश त्याला मिठी मारून ढसाढसा रडतोय, मग माझ्या ,म्हणजेच अनिरुद्धच्या, म्हणजेच त्याच्या वडिलांच्या पाया पडून निघायला लागतो, आणि मग अनिरुद्ध एक बाप मुलाला मिठी मारून रडतो. माझ्या डोक्यामध्ये सगळं वातावरण इतकं राममय झालं होतं, की serial च्या scenes मध्ये मला वनवास, भरत भेट. असंच काहीसं जाणवत होतं. डोक्यामध्ये अनेक विचार येत आहेत, की इतका छान राममय वातावरण अख्या जगात झाला आहे तर, रामाची शिकवण आपल्यामध्ये रुजवण्याची गरज आहे असं मला वाटतं. मातृ- पितृ भक्ती, भावंडांवर असीम प्रेम, कर्तव्य, त्याग, कोणाही विषयी कटूता न बाळगणे, सतत प्रसन्न आणि आनंदी राहणे, सत्याचा नेहमी विजय होतो. असं काहीसं आपल्यामध्ये सुद्धा आपण आत्मसात करावं आणि पुढच्या पिढीला ही ते द्यावं. जय श्रीराम’.