सावरकरांच्या बायोपिकवरील वाद अभिनेत्याला महागात पडणार..?; मनसेने दिला इशारा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही महिन्यांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि मुख्य सावरकरांच्या भूमिकेतील अभिनेत्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. पण अलीकडेच त्यांनी हा चित्रपट सोडल्याचे समोर आले. ज्याचे कारण होते स्वामित्व हक्क. यावरून महेश मांजरेकर आणि रणदीप हुड्डा यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे समोर आले. यात आता मनसेने उडी घेतली असून संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी थेट दिग्दर्शक रणदीप हुड्डा याला इशारा देणारे एक पत्र लिहिले आहे. या पत्राची प्रत त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्वीटरवर शेअर केली आहे. या पत्रात लिहिलंय कि, ‘हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट हिंदी भाषेतून जगभरात प्रदर्शित होणं ही तमाम सावरकरप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लंडनमध्ये म्हणजेच थेट इंग्रजांच्या भूमीत इंग्रजांना आव्हान देऊन स्वातंत्र्यवीरांनी समस्त जगाला अचंबित केलं होतं. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही शेवटपर्यंत ते ब्रिटीशांपुढे झुकले नाहीत. भारतमातेला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, अशा स्वातंत्र्यवीरांची धगधगती गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची मोठी उत्सुकता आहे’.

पुढे लिहिलंय, ‘प्रदर्शनापूर्वी मात्र आता स्वामित्व हक्कांवरुन वाद सुरू झाला आहे, जो अतिशय दुर्दैवी आहे. हा वाद ताबडतोब थांबायला हवा, कारण यामुळे चित्रपट प्रदर्शनाला विलंब झाला तर तो खुद्द स्वातंत्र्यवीरांचा अपमान असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. हा वाद त्वरित मिटवण्यात यावा आणि स्वातंत्र्यवीरांचं कार्य घराघरात पोचावं ही आमची भूमिका आहे. आम्ही दिलेल्या इशाऱ्याचा आपण योग्य आदर राखाल अशी आमची अपेक्षा आहे’. या पत्राद्वारे अमेय खोपकर यांनी थेट रणदीप हुड्डाला सूचक इशाराही अमेय खोपकर यांनी दिला आहे. महेश मांजरेकर यांनी रणदीप सोबत झालेल्या मतभेदापायी हा चित्रपट सोडल्यानंतर आता दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेत्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप हुड्डा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय.