इतकं बहिरं आहे का माझं सरकार..? ‘त्या’ मुद्द्यावर नाना पाटेकरांनी व्यक्त केलं रोखठोक मत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीत देखील प्रचंड काम केले आहे. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमा देत त्यांनी अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. लवकरच त्यांचा ‘ओले आले’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ घातला आहे. येत्या ५ जानेवारी २०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि मकरंद अनासपूरे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमानिमित्त नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत नाव न घेता मराठा आरक्षणाबद्दल मत व्यक्त केलं आहे.

एका नामवंत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांना मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण व त्यांच्या मागण्यासंदर्भात नाव न घेता प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना नाना पाटेकर म्हणाले, ‘मी कुठल्याही जातीचा असेन, माझ्या जातीसंदर्भात जर तू काही बोलत असशील तर सगळ्या मोठ्या जाती- समूहातला मी एक बिंदू म्हणून मला कळायला पाहिजे की हे मला वापरत आहेत का..? मला हे लक्षात यायला पाहिजे. ज्या क्षणाला मी त्यांना माझा वापर करू देईन त्या क्षणाला ते मला वापरतील. पण त्यांना स्वतःचा वापर करू द्यायचा की नाही हे मी ठरवायचं आहे. अशी खूप मंडळी आहेत जी तुम्हाला वापरू इच्छिते, पण सरतेशेवटी हे तुमच्यावर आहे’.

बसवर झालेल्या दगडफेकीचा आणि जाळपोळीचा उल्लेख करत नाना म्हणाले, ‘मी हे का जाळायचं..? मी हे का फोडायचं..? हे मी ठरवायचं आहे. सरतेशेवटी हे माझं आहे ना.. सगळंच माझं आहे. मला काय अधिकार आहे बस जाळण्याचा, मला काय अधिकार आहे काचा फोडण्याचा, बरं तेवढ्याने माझं सरकार ऐकणार असेल तर मग इतकं बहिरं आहे का माझं सरकार..? सर्वात आधी तुमचं म्हणणं मुद्देसुदपणे सरकारसमोर मांडा. तुमची भीती वाटणं बंद झालंय, सामान्य जनता म्हणून तुमची राजकारण्यांना भीती वाटत नाही. ज्या दिवशी ती भीती वाटायला लागेल, त्या दिवशी ते पुन्हा सुधारतील’. सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त व्हायला हवं, असंही त्यांनी मत व्यक्त केलं आहे.