‘माझ्या अंत्यसंस्काराची लाकडं तयार..’; नाना पाटेकरांनी स्वतःच्या मृत्यूविषयी केलेले वक्तव्य चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक वर्ष विविध चित्रपटांमधून एकापेक्षा एक कमालीच्या भूमिका साकारल्यानंतर सध्या नाना मनोरंजन विश्वापासुन दूर आहेत. अत्यंत साधी राहणी मात्र उच्च विचारसरणी असे जीवन ते जगत आहेत. मोठ्या ब्रेकनंतर नाना ‘द व्हॅक्सीन वॉर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

दरम्यान नाना पाटेकर यांनी ‘द व्हॅक्सीन वॉर’ सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत मृत्यूविषयी भाष्य केले आहे. या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मृत्युसाठी १२ मण लाकडे तयार ठेवली आहेत, असा खुलासा केला. ही १२ मण लाकडे सुकी आहेत. ओली लाकडे वापरल्याने खुप धूर होतो ज्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येईल आणि ते माझ्यासाठी रडत आहेत असा अनेकांचा खोटा समज होईल, असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी यावेळी केलं.

इतकेच नव्हे तर, नानांच्या कुटुंबात सात भावंडे होती. पण आता त्यापैकी एकही या जगात नाही. शिवाय नानांच्या पालकांचेही निधन झाले आहे. त्यामुळे साहजिकच आता कुटुंबात नाना एकटेच आहेत आणि याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे निधनाच्या वेळी कोणताही गैरसमज न होता, माझा फोटोही कोणी लावू नये आणि पूर्ण विसरुन जावे, अशी नानांनी इच्छा व्यक्त केली आहे. नाना पाटेकरांनी स्वतःच्या मृत्यूविषयी केलेल्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.