सुखी वैवाहिक आयुष्याचे ’10 हजार 227 दिवस…’; नारकर जोडप्याच्या संसाराला 28 वर्ष पूर्ण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकर अत्यंत लोकप्रिय जोडपं आहे. गेली अनेक वर्ष हे दोन्ही कलाकार मराठी कलाविश्वात कार्यरत आहेत. वयाच्या मानाने त्यांची फिटनेस तरुणांना लाजवणारी आहे, यात काही शंकाच नाही. अनेकदा हे जोडपं त्यांच्या रिल्समुळे चर्चेत असतं. दरम्यान, ३ डिसेंबर रोजी या जोडप्याने वैवाहिक आयुष्याची २८ वर्ष पूर्ण केली आणि यानिमित्त ऐश्वर्या यांनी शेअर केलेली व्हिडीओ व्हायरल झाली आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर दोघेही सोशल मीडियाववर फार सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांसोबत रिल्स बनवतात, प्रेम व्यक्त करताना दिसतात. काहीवेळा ट्रोलिंग होऊनही ते एकमेकांची खंबीरपणे साथ देतात. अशा या जोडीने त्यांच्या सुखी संसाराची तब्बल २८ वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्त अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील व्हिडीओ पोस्टवर त्यांनी लिहिलंय, ‘आमच्या सुखी वैवाहिक आयुष्याचे १० हजार २२७ दिवस’. यासोबत फोटो शेअर करताना लिहिलंय, ‘२८ वर्ष एकत्र’. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव करत आपल्या लाडक्या जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर म्हणजेच माहेरच्या पल्लवी आठल्ये यांची रंगभूमीवर काम करताना अविनाश यांच्यासोबत ओळख झाली. नाटकाच्या दौऱ्यादरम्यान अविनाश यांचा जीव पल्लवीमध्ये गुंतला. दौरा संपल्यावर अविनाश यांनी पल्लवी यांनी आपल्या भावना सांगितल्या. त्यानंतर आठल्येंच्या घरगुती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या अविनाश यांनी पल्लवी यांना थेट लग्नासाठी मागणी घातली. दोघांच्या लग्नाला संमती मिळताच ३ डिसेंबर १९९५ रोजी ते लग्नबंधनात अडकले आणि पल्लवी आठल्ये पुढे ऐश्वर्या नारकर झाल्या. आज २८ वर्ष एकमेकांच्या साथीने दोघांचा संसार सुरु आहे आणि असाच पुढे रहावा अशा सदिच्छा !!