‘त्या’ प्रथेमुळे बदलणार गुंजा- कबीरचं आयुष्य; नव्या मालिकेच्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीकोरी मालिका येत आहे. जिचं नाव ‘कुन्या राजाची गं तू रानी’ असे आहे. या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली मराठी मालिका ‘जीव झाला येडापीसा’ फेम अभिनेत्री शर्वरी जोग आणि ‘फुलाला सुंगंध मातीचा’ फेम अभिनेता हर्षद अटकरी एकत्र दिसणार आहेत. हि मालिका येत्या १८ जुलै २०२३ पासून स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हि मालिका अतिशय वेगळ्या ढंगाची, चालीची आणि वेगळ्या कथानकाची आहे. त्यामुळे प्रोमो व्हिडीओ रिलीज झाल्यापासून या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पहायला मिळते आहे.

या मालिकेतून डोंगर पाड्यासारख्या छोट्याश्या गावात वाढलेल्या पण स्वप्न मात्र एकदम मोठी पाहणाऱ्या गुंजाची प्रेरणादायी गोष्ट पहायला मिळणार आहे. गुंजा ही अतिशय निरागस आणि स्वत: आनंदात राहून इतरांनाही भरभरुन आनंद देणारी आहे. तिला शिकून खूप मोठं व्हायचंय आणि आपल्या आईला शहरात घेऊन जायचंय. तर दुसरीकडे करिअर सर्वस्व असणारा कबीर हा पेश्याने पत्रकार आणि एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेला खूप कमी वेळात आपल्या फिल्डमध्ये महत्वाचे स्थान मिळवलेलं असं धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. त्याला समाजात बदल घडवायचा आहे आणि शोषितांचा लढा लढायचा आहे. यासाठी तो काहीही करायची तयारी ठेवतो.

दरम्यान एका बातमीच्या मागावर असताना कबीर आणि गुंजाची भेट होते. पण गावच्या एका कठोर निर्णयामुळे दोघांच्या आयुष्यात ट्विस्ट येतो आणि त्यांच्या नात्याची सुरुवात होते. अशी अतिशय रंजक आणि उत्कंठा वाढवणारी हि गोष्ट आहे. या मालिकेविषयी स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेची वातावरण निर्मिती, तिचा बाज आणि कथा ही इतर मालिकांपेक्षा वेगळी आहे. गुंजा या अतिशय धडाडीच्या मुलीची ही गोष्ट आहे तिला कालांतराने एका प्रामाणिक मुलाची साथ मिळते. तोपर्यंत हा प्रवास बघणं खूप उत्सुकता निर्माण करेल. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच दर्जेदार मालिका सादर करते’.