सायली संजीव आणि ऋषी सक्सेना पुन्हा एकत्र दिसणार; ‘या’ चित्रपटासाठी स्क्रीन शेअर करणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. “समसारा” (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला.

संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या “समसारा” या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे करत आहेत. सागर लढे, विश्वेश वैद्य, समीर मानेकर यांच्या कथेवर समीर मानेकर, सागर लढे यांनी पटकथा रचली आहे.

समीर मानेकर, निहार भावे यांनी चित्रपटाचे संवादलेखन केलं आहे. विश्वेश वैद्य यांनी संगीत, अक्षय राणे छायांकनाची जबाबदारी निभावत आहेत. सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. कार्यकारी निर्माता म्हणून महेश भारंबे व अन्वय नायकोडी काम पाहणार आहेत.

“समसारा” या चित्रपटाची कथा अतिशय अनोखी आहे. गर्भवती भानवीच्या दैवी जुळ्या मुलांना नष्ट करण्याची इच्छा असलेला एक असुर तिच्यासमोर येतो आणि देव, असूर यांच्यात युद्ध सुरू होते. त्यामुळे मृत्यूचा देव यम आणि जीवनाची देवी यमी यांची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अत्यंत वेगळी गोष्ट आणि उत्तम स्टारकास्ट यांचा मिलाफ “समसारा” या चित्रपटात झाला आहे. त्याशिवाय प्रेक्षकांची आवडती सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकत्र येणं हे महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे.