‘अशी निर्मिती करायला धाडस लागतं..’; अभिनेता सुबोध भावेने केलं ‘ताली’ सिरीजच्या टीमचं कौतुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनित ‘ताली’ ही वेबसिरीज १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली. या सीरिजचे कथानक तृतीयपंथी समाजासाठी झटणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या समाजसेविका श्री गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारलेले आहे. प्रेक्षकांनी या सीरिजला पसंती दिली असून प्रत्येक कलाकाराचे भरभरून कौतुक केलॆ आहे. अनेकांनी हि सिरीज पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. अशीच एक पोस्ट मराठी अभिनेता सुबोध भावे यानेही शेअर केली आहे. जी चांगलीच व्हायरल झाली आहे.

अभिनेता सुबोध भावे याने हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारीत ताली ही अप्रतिम वेब मालिका जिओ सिनेमावर पाहिली. ”बस बाई बस” या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गौरी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. क्षितीज पटवर्धन मित्रा, त्यांचे संपूर्ण आयुष्य तू ज्या पद्धतीने तुझ्या लेखणीतून उतरवलं आहेस त्याला तोड नाही. खूप खूप कौतुक तुझे..’ यानंतर पुढे या सिरिजमध्ये काम केलेल्या मराठी कलाकारांना टॅग करत त्यांचेदेखील सुबोधने कौतुक केले आहे. ‘हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, नंदू माधव, शितल काळे तुम्ही तुमच्या भूमिका किती सुंदर साकारल्या आहेत. कार्तिक निशाणदार, अर्जुन बरन.. मित्रांनो अशी निर्मिती करायला धाडस लागतं. अप्रतिम. जिओ सिनेमाचे मनापासून धन्यवाद ही मालिका सादर केल्याबद्दल’.

पुढे लिहलंय, ‘रवी जाधव, देवा.. तुझ्या प्रत्येक कलाकृती मध्ये तुझा खास असा ठसा असतो. या कलाकृतींमध्ये तो कायमचा आमच्या मनावर कोरला गेलाय. प्रेम… कृतिका देव, गणेश – गौरी ही व्यक्तिरेखा उभी रहाण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे’. तसेच या पोस्टमध्ये सुबोधने अभिनेत्री सुश्मिता सेनचंही कौतुक केले काही. त्याने लिहिलंय की, ‘सुश्मिता सेन, तुम्ही त्या झाला होता. बस इतकेच…’ यासोबतच सुबोधने, ‘श्री गौरी सावंत तुम्हाला मनापासून वंदन’ असेही लिहिले आहे. सुबोधने या पोस्टमधून ‘ताली’ ही सिरीज घडवणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक अगदी भरभरून केले आहे. या पोस्टमध्ये सुबोधने ज्यांचे कौतुक केले आहे त्यांनी कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत.