‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेचे 900 भाग पूर्ण; वाहिनीने मानले प्रेक्षकांचे आभार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह हि मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘ठरलं तर मग’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘प्रेमाची गोष्ट’ या सर्व मालिका स्टार प्रवाहाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. या मालिकांवर प्रेक्षकांकडून कायम प्रेमाचा वर्षाव होताना दिसतो. यांपैकी ‘सुख म्हणजे नक्की असतं’ या मालिकेला तर प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासून विशेष पसंती दिली आहे आणि म्हणून हि मालिका ९०० भागांचा टप्पा पूर्ण करू शकली आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका तीन वर्षांपूर्वी अर्थात २०२० साली सुरु झाली. मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि मालिकेतील कलाकार तर प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग झाले. गौरी, जयदीप, शालिनी, मल्हार, देवकी, माई या पात्रांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील ट्विस्ट, कलाकारांचा अभिनय यामुळेच हि मालिका १००, २००, ५०० आणि आता तब्बल ९०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार करू शकली आहे. यानिमित्त ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

या पोस्टमधून वाहिनीने प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत. ‘स्टार प्रवाह’ने मालिकेतील कलाकारांचे फोटो शेअर करत लिहीलं आहे की, ‘आज सादर होत आहे ”सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेचा ९०० वा भाग…. आपण या ९०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार… त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना…’. सध्या मालिकेत शालिनीने गौरी- जयदीपच्या प्रेमाचा शेवट करणार असल्याचं लवकरच पहायला मिळणार आहे. तसा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.