‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; भावुक होत म्हणाली, ‘अखेरचा हा तुला दंडवत….’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका आता २५ वर्षांचा लीप घेणार आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सुरू होते आहे. त्यामुळे मालिकेच्या पहिल्या पर्वातील अनेक पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या नव्या पर्वात रेणुका शिर्के हे पात्र दिसणार नाही. अर्थातच अभिनेत्री अपर्णा गोखलेची मालिकेतून एक्झिट होत आहे. दरम्यान तिने सेटवरील शेवटच्या दिवसाचा एक व्हिडीओ शेअर करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

यात तिने लिहिलंय, ‘अखेरचा हा तुला दंडवत… आज प्रसारित होतोय आमच्या टीमचा शेवटचा भाग… आता नवीन टीम… नवीन पात्र… त्याच जोमाने… त्याच जोशात सगळे एकत्र येणार आणि धमाल करणार… पण गेले साडेतीन वर्षे आम्ही एकत्र होतो. कसे हे दिवस गेले कळाले नाही. कारण आम्ही एकत्र होतो. कामाची वेगळीच मजा यायचं कारण आम्ही एकत्र होतो… एक वेगळाच हुरुप, रोज काहीतरी नवीन करण्याची, आपल्या पात्रामध्ये नवीन काहीतरी शोधण्याची आमची भूक… आम्ही खूप मोकळेपणाने बागडलो, खेळलो. कारण आम्ही एकत्र होतो. आमच्यात रुसवे, फुगवे देखील झाले. पण त्याचा परिणाम आमच्या कामावर कधीच नाही झाला. ते रुसवे फुगवे आम्ही सगळ्यांनी मिळून, एकमेकांशी बोलून घालवले. कारण आम्ही एकत्र होतो…’.

‘आमची सगळ्यांची एक मूठ बांधली ती म्हणजे आमची सगळ्यांची लाडकी आणि टीमचा पाठीचा कणा असल्यासारखी माधुरी देसाई, तुला पण माहितीये तू आमच्या करता किती भारी आहेस आणि तू आमची मूलभूत गरज आहेस. अमेय हिंदळेकर धन्यवाद. मला या प्रोजेक्टमध्ये घ्यायचा विचार केलास आणि एक छान भूमिका माझ्या वाट्याला दिलीस. चंद्रकांत कणसे सर, आमच्या जहाजाचे कॅप्टन. तुम्ही आपल्या जहाजावरची पताका कायम डौलाने फडफडवत ठेवलीत. तुमच्यामुळे आम्हाला आमचे पात्र, त्याचे बारीक बारीक कंगोरे मिळाले. पुन्हा एकदा धन्यवाद. आमची पूर्ण प्रोडक्शनची टीम. दिग्दर्शक, डिओपीपासून ते स्पॉटदादा पर्यंत सगळे. तुम्ही लय कमाल आहात. आम्हाला छान दाखवायला किती मेहनत करता. तुम्हाला सलाम…!!’

‘आणि माझे सख्खे मित्र मैत्रिणी. मंदार जाधव, गिरीजा प्रभू, गणेश रेवडेकर, वर्षा उसगावकर, सुनील गोडसे, माधवी निमकर, कपिल होनराव, संजय भुवन, भक्ती रत्नपारखी तुमच्या बद्दल काय अन् किती लिहू. कुठलेही इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेज कमीच पडेल. बोलायला शब्द सुचत नाही. एकच सांगेन, तुम्ही सगळे होता म्हणून मी होते आणि आहे. ”स्टार प्रवाह” तुमचे विशेष आभार. तुमच्यामुळे हे सगळे शक्य झाले. तुम्ही आम्हा सर्वांची भेट घडवून आणली. कोठारे व्हिजन तुमचे आभार तरी कसे मानू… आपल्या माणसाचे आभार मानायचे तरी कसे असतात हे माहीतच नाही… खरंय, तुम्ही- आम्ही असा दूजाभाव कधी झालाच नाही. कायम, फक्त आणि फक्त ‘आपण’ होतो. आपण एका प्रोजेक्टच्या निमित्ताने भेटलो. करोनाच्या काळात जेव्हा माणसे दुरावत होती, तेव्हा तुम्ही आम्हा सगळ्यांना एकत्र आणले आणि आपला परिवार झाला. एक मोठा परिवार. सगळ्यांच्या सुखं- दुःखात सामील होणारा एक छान, मोठा परिवार… रसिक मायबाप. असेच प्रेम करत रहा, आशीर्वाद असू द्या’.