तीन मित्र, ‘ती’ रात्र आणि पार्टी.. त्यानंतर काय घडलं..? ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर भेटीला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. टिझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच आता ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून लक्षात येते की तीन बिनधास्त मित्र मजा करायला विदेशात जातात आणि तिथे त्यांच्याबरोबर एक अनपेक्षित घटना घडते.

त्या रात्री पार्टीनंतर नेमकं काय घडले आणि हे तीन मित्र कसे अडकले? त्यांची ही मजा, सजा कशी बनली, हे २९ सप्टेंबरला प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल. या सगळ्या घटनेमुळे या तिघांची मैत्री टिकते की नाही? या जाळ्यात अडकलेले हे तीन सीताराम कसे बाहेर पडतील..? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि हृषिकेश जोशी हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हृषिकेश जोशी म्हणाले, ‘चित्रपटाचा ट्रेलर पाहून अंदाज आला असेलच की मजा करायला गेलेल्या या तीन मित्रांची कशी तारांबळ उडते. चित्रपटातील सगळेच कलाकार सर्वोत्कृष्ट आहेत. या सगळ्यांनाच विनोदाची उत्तम जाण आहे. आमचे चित्रीकरण लंडनला होणार होते, त्याच वेळी लंडनच्या राणीचे निधन झाले. त्यामुळे तिथे काही ठिकाणी आमच्या चित्रीकरणावर थोड्या मर्यादा येत होत्या. तरीही आमच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार आम्ही चित्रीकरण केले. ही सगळीच प्रक्रिया खूप मस्त होती. जितकी धमाल आम्हाला चित्रपट करताना आली, त्यापेक्षा जास्त धमाल प्रेक्षकांना चित्रपट पाहताना येईल’.