‘आपले प्रॉडक्ट बाजारात विकण्यासाठी..’; ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर मराठी दिग्दर्शकाची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट कमालीचा यश संपादन करत आहे. या चित्रपटाची कमाई पाहता मराठी चित्रपटांचे सोन्याचे दिवस अजून संपलेले नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. प्रेक्षक, समीक्षक आणि विविध स्तरांवर या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. अशातच आता एका मराठी दिग्दर्शकाने दुसऱ्या मराठी दिग्दर्शकाच्या कलाकृतीला मिळणारे यश पाहून आनंद व्यक्त केला आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियावर या चित्रपटासाठी आणि त्याच्या टीमसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी दिग्दर्शक विजू माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकहो तुमचे मनापासून आभार… सध्या तिकीट बारी वर “बाई पण भारी देवा” हा ‘भारीच’ जमून आलेल्या सिनेमा ‘भारी’ गर्दी जमवतो आहे. ज्याचा मला एक मराठी चित्रपटकर्ता म्हणून अभिमान आहेच. त्याबद्दल केदार शिंदे आणि त्याच्या टीमचं विशेषतः लेडीज ब्रिगेडचं मनापासून अभिनंदन. रसिक प्रेक्षकांना दूषणं देऊन काहीही होत नाही. ‘उत्तम सिनेमा’ हा एकमेव यशाचा मार्ग आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मराठी लोक मराठी सिनेमांना गर्दी करत नाहीत याची कारणे मराठी सिने निर्माते आणि दिग्दर्शक यांनी शोधली आणि त्या बरहुकूम सिनेमे बनवले तर लोक गर्दी करतात हे आता दिसून आलं आहे. आत्ताच्या अंदाजानुसार तिकीट बारी वरील सर्वाधिक कमाईचा विक्रम सिनेमा करण्याची शक्यता आहे. मला याबाबतीत जिओचे निखिल साने यांचं कौतुक वाटतं. उगाचच कुणाच्यातरी पदरी देव अमाप यश टाकत नसतो. त्यामागे त्या व्यक्तीचा संशोधन, अनुभव आणि योग्य वेळ साधून करावयाच्या गोष्टी याचं कौशल्य अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात’.

‘सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही मार्केटच्या स्वभावानुसार आता पुन्हा एकदा स्त्रियांवर आधारित सिनेमांची लाट येऊ शकेल. त्यात काही वावगं आहे असं मी म्हणणार नाही. कारण जे खपतं ते विकावं हा एक सामान्य बुद्धी असलेल्या व्यावसायिकाचा आडाखा असणारच. मुळात सिनेमा बनवताना कोणीही ‘चला आज वाईट सिनेमा बनवूया’ असं म्हणून सिनेमा बनवत नाही. पण चांगला सिनेमा बनवण्यासाठी केवळ ‘मला ही गोष्ट फार आवडली, म्हणून मी हा सिनेमा केला’ असे निर्माते नकोत. इतर व्यवसायांनी जसं सर्वे, प्रवाह आणि नेमका टार्गेट ऑडियन्स असा अभ्यास करून मग आपले प्रॉडक्ट बाजारात विकण्यासाठी आणण्याची वाट निवडली हीच पद्धत आता मराठी सिनेमांनी उत्तरोत्तर स्वीकारायला हवी. आणि मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा थेटर मध्ये टाळ्या शिट्ट्या नाच करत सिनेमा एन्जॉय करण्याची ‘सवय’ लावायला हवी. आता यातही ‘प्रेक्षकानुनय केलेला सिनेमा’ ‘त्यात काय एवढं?’ ‘मला बाई फार नाही आवडला’ ‘आशयघनता कुठे आहे?’ “सिनेमात डेप्थ नाही’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया असतील, त्या असणारच. But nothing succeeds like success. ‘बाई पण भारी देवा’ च्या सगळ्या टीमला आणि त्या टीमला यश देणाऱ्या अख्या जगभरच्या रसिक प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. मराठी चित्रपटांच्या नावानं चांगभलं!!’